
जळगाव मिरर | ७ जून २०२४
लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला राज्यात फटका बसल्याने आता अनेक नेत्यांसह कार्यकर्ते संभ्रमित झाले असतांना नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय. परिणामी एकनाथ शिंदे यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत मोठी फूट पाडली. लोकसभा निवडणुकीतही एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे यांनी लढवलेल्या 15 जागांपैकी केवळ 7 जागांवर शिंदेंचे खासदार निवडणू आले. शिंदे गट या धक्क्यातून सावरत असताना आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला मोठा धक्का देऊ शकते अशी माहिती समोर आली. दरम्यान लोकसभा निवडणूक आणि निकालादरम्यान शिंदे गटातील 5 ते 6 आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला. मात्र हे आमदार कोण आणि कुठल्या भागातील आहेत, याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने 15 जागा लढवल्या होतात. त्यापैकी 7 जगांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. तर आठ जागांवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच शिवसेना ठाकरे गटाने 21 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ९ जागांवर त्यांना विजय मिळाला. तर १२ जागांवर ठाकरे गटाला पराभूत व्हावं लागलं होतं.
आतापर्यंत सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटात घेत असताना ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली. त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रामुख्याने ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.




















