
जळगाव मिरर | २६ मे २०२५
मालदाभाडी (ता. जामनेर) येथील विठ्ठल मंदिर सभागृहात आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साही व लोकाभिमुख वातावरणात पार पडले. या शिबिरात २५ विभागांचे ३८ स्टॉल्स उभारण्यात आले होते, ज्यामार्फत एकूण २४५ पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देण्यात आला.
या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार जामनेर श्री. नानासाहेब आगळे यांच्या प्रस्ताविक भाषणाने झाले. यावेळी श्री. मयूर पाटील, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.
महसूल विभागाच्या स्टॉलवर १३६ जणांना ७/१२ व ८अ उतारे वितरित करण्यात आले. जात व निवासी प्रमाणपत्रासाठी ४० लाभार्थ्यांना सेवा देण्यात आली. तसेच अंत्योदय, प्राकुला व नवीन शिधापत्रिका २७ लाभार्थ्यांना देण्यात आल्या, तर संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ १६ नागरिकांना मिळाला. पंचायत समिती विभागामार्फत २२, सामाजिक न्याय विभागामार्फत २ आणि कृषी विभागामार्फत २ लाभार्थ्यांना सेवा पुरविण्यात आली.
शिबिराची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या, विभागीय समन्वयातून तत्काळ सेवा देण्यात आल्या आणि अनेक लाभार्थ्यांना तात्काळ प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ मिळाला. नागरिकांनी समाधान व आनंद व्यक्त करत प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
“शासन आपल्या दारी” या उपक्रमाला बळकटी देणाऱ्या या शिबिरात विविध विभागांचा प्रभावी सहभाग अनुकरणीय ठरल्याची माहिती जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सांगितले.