
जळगाव मिरर | १ मार्च २०२६
यावल-बोरावल-टाकरखेडा मार्गावरील भालशिव फाट्यावर शनिवारी सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या बस व विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालकासह सुमारे १० ते १२ विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. जखमींवर तातडीने उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळची एसटी बस (क्र. एमएच ४० एन ९८४५) शनिवारी सकाळी सुमारे ७:३० वाजता यावल बसस्थानकावरून बोरावल गावाकडे नियमित फेरीसाठी रवाना झाली होती. दरम्यान, भालशिव फाट्याजवळ समोरून येणारी विद्यार्थ्यांची ने-आण करणारी कार (क्र. एमएच ३७ जी ६६८०) आणि एसटी बस यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावले.
अपघातानंतर स्थानिक नागरिक व बसमधील प्रवाशांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना आणि चालकाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातग्रस्त कार जप्त करण्यात आली असून दोन्ही वाहनांची तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता; मात्र पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी ग्रामीण रुग्णालय व पोलिस ठाण्यात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली तसेच घटनेची माहिती घेतली. अपघात नेमका कशामुळे झाला, चालकाची चूक की रस्त्याची परिस्थिती याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




















