जळगाव मिरर | २३ जुलै २०२५
शहरातील रामेश्वर कॉलनीतील स्वामी समर्थ केंद्र चौकात किरकोळ कारणावरुन दोन गटात तुफान दगडफेक झाली. यामध्ये सागर पाटील व मनोज निंबाळकर हे दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना दि. २२ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शहरातील रामेश्वर कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून दोन गटात धूसफूस सुरु होती. दरम्यान, परिसरातील काही तरुण हे स्वामी समर्थ चौकात असलेल्या अपार्टमेंटजवळ उभे होते. यावेळी दहा ते बारा जणांचे टोळके दुचाकीवरुन त्याठिकाणी आले. त्यांनी तेथे उभ्या असलेल्या तरुणांवर अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होवून पळापळ झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दगडफेकीत सागर पाटील व मनोज निंबाळकर हे दोघे तरुण किरकोळ जखमी झाले आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरीता गेले होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यासह संशयित हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. रात्रीच्यावेळी या परिसरात गस्तीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. पोलीस येताच दगडफेक करणाऱ्या संशयित तेथून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक राहुल तायडे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर क्युआरटी पथकाला पाचारण केल्यानंतर याठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
