जळगाव मिरर | २७ जून २०२५
गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठी- हिंदी भाषेचा वाद सुरु असून आता शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळे आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र आता महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी घोषणा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यांच्या या पोस्टमुळे आता राज्यातील नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधामध्ये सर्वच विरोधी पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत होते. तेच आता स्पष्ट झाले आहे. काल राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर लगेच उद्धव ठाकरे यांनी सात जुलै रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासूनच सर्व एकत्र का येत नाही? असे प्रश्न विचारले जात होते. यावर आता अखेर तोडगा निघाला असून हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे. यासोबतच संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो देखील पोस्ट केला आहे.
राज्य सरकारच्या वतीने त्रिभाषा सूत्र स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये आता पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवली जाणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. या आधी राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी तर उद्धव ठाकरे यांनी सात जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. दोन्ही ठाकरे बंधू जर मोर्चा काढणार असतील तर एकत्र का नाही? असा प्रश्न त्यामुळे राज्यात विचारला जात होता. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील शाळात हिंदी विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. त्यामुळे हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार हे निश्चित झाले आहेत.
या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मराठी माणसाची ताकद एकत्र दिसणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काल राज ठाकरे यांनी देखील तेच आव्हान केले होते. त्याला समोरून प्रतिसाद मिळाला आहे. मराठी भाषेची गळचेपी आणि हिंदी भाषेची सक्ती लादण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या विरोधात मराठी माणसाने एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे. मराठी भाषा हा राजकीय मुद्दा नाही तर मराठी भाषेपुढे कोणीही छोटे मोठे नसल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे. सगळे एकत्र आले पाहिजे, यासाठी राज ठाकरे देखील सकारात्मक आहेत. त्यामुळे एकत्रितपणे पाच जुलै रोजी हा मोर्चा निघेल, अशी माहिती देखील संदीप देशपांडे यांनी वृत्त-वाहिनीशी बोलताना दिली आहे.
मराठी माणसासाठी मी माझा वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवू शकतो, असे मत राज ठाकरे यांनी या आधी देखील व्यक्त केले होते. महाराष्ट्रापेक्षा काहीही मोठे नाही, हे यातून आपल्याला पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी देखील लगेच राज ठाकरे यांना प्रति टाळी दिली होती. मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राचे हित पाहणाऱ्यांना आपण बरोबर घेतले पाहिजे, अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. त्यामुळे हा मोर्चा एकत्र निघू नये, यासाठी बरेच प्रयत्न केले गेले, असा आरोप देखील अरविंद सावंत यांनी केला आहे.
