
जळगाव मिरर । ८ डिसेंबर २०२२
चोपडा तालुक्यातील धानोरा सह परिसरातील तब्बल २० ते २५ गावांना सेवा देणाऱ्या बीएसएनएल दुरसंचार कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात चोपडा पं.स.च्या माजी सभापती कल्पना पाटील यांनी संताप व्यक्त करत आठ दिवसात सेवा सुरळीत सुरू न केल्यास उपोषणास बसण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत सविस्तर असे की भारत संचार निगम लिमिटेड ही भारतीय कंपनी असल्याने व कमी दरात सुविधा उपलब्ध करून दिल्याने कंपनीवर विश्वास ठेवत चोपडा तालुक्यात हजारो ग्राहकांनी बीएसएनएलचे सिम खरेदी करत सेवा वापरण्यास सुरुवात केली. कंपनीचा कोट्यावधींचा कारभारही आहे. मात्र स्वदेशी असलेली ही कंपनी ग्राहकांच्या सेवेस पात्र ठरत नसल्याच्या अनुभव चोपडा तालुक्यातील ग्राहकांना येत आहे. याबाबत वारंवार लेखी, तोंडी तक्रारी देऊनही निगरगठ्ठ यंत्रना जागी होत नाही. कायम झोपेचे सोंग घेऊन योग्य व्यवस्थापन न करता निव्वळ वरिष्ठ स्तरावर बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत असल्याने संतप्त झालेल्या धानोरा येथील पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना दिनेश पाटील यांनी संबंधित कंपनीने येत्या आठ दिवसात ग्राहकांना सुरळीत व नियमित सुविधा न दिल्यास संबंधित कंपनी विरोधात उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे. कंपनीची सेवा बंद असल्याने ग्राहकांना ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते वारंवार फोन बंद असल्याने सामाजिक, नातेवाईक, यांच्या फोन बंद असल्याचा कारणावरून गैरसमज होत असतो, काही वेळा आर्थिक व्यवहारांमध्ये फोन बंद असल्याचे कारण दाखवून खटकेही उडत असतात. या सर्व गोष्टींना बीएसएनएल कंपनी जबाबदार असल्याचे सभापती कल्पना पाटील यांनी म्हटले आहे. धानोरा येथे बीएसएनएलचे स्वतंत्र टॉवर आहे परिसरात तब्बल २५ ते ३० गावांना येथून सेवा दिली जाते. चार आकडे येथे नियमीत कर्मचारीही नेमलेला नाही. दिवसभरातून असंख्य वेळा टावर बंद पडते कधीकधी तर तब्बल दोन दोन तीन दिवस सेवा सुरळीत होत नाही. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता ते मात्र जबाबदारी झटकून देतात.




















