
सिलेंडरसाठी ३–५ दिवस प्रतीक्षा; हॉटेल व्यवसाय अडचणीत, व्यावसायिक गॅस बंदीची अफवा फेटाळली
जळगाव मिरर | ११ मार्च २०२६
आखाती देश इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचे परिणाम आता महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू लागले आहेत. राज्यात घरगुती एलपीजी, व्यावसायिक गॅस आणि सीएनजीच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाला असून सिलेंडरसाठी ग्राहकांना अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने या अफवांचे खंडन करत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.
केंद्र सरकारने सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीचा विचार करून सर्व राज्यांना घरगुती एलपीजी पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे व्यावसायिक एलपीजी पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमात तात्पुरता बदल होऊ शकतो. मात्र व्यावसायिक गॅस पूर्णपणे बंद झाल्याची माहिती चुकीची असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला बसत आहे. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने आणि दरात १५० ते २०० रुपयांची अचानक वाढ झाल्याने हॉटेल मालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अनेक ठिकाणी गॅसचा साठा संपत आल्याने हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हॉटेल असोसिएशनने सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करून पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
सामान्यतः बुकिंगनंतर २४ तासांत मिळणारा एलपीजी सिलेंडर आता ३ ते ५ दिवसांनंतर मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. पुरवठ्यातील तुटवड्यामुळे गॅस वितरकांवरही मोठा ताण निर्माण झाला असून ग्रामीण भागात ही समस्या अधिक गंभीर होत आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने आगामी काळात महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. “पुरवठा साखळीवर ताण असला तरी सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी सिलेंडरचा अनावश्यक साठा करू नये आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा,” असे आवाहन प्रशासनाने केले आहे.





















