
जळगाव मिरर / १७ नोव्हेंबर २०२२
कोरोना काळात दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विविध सवलती देण्यात आल्या होत्या, जसे आपल्याच शाळेतील परीक्षा केंद्र आणि अर्ध्या तासाचा वाढीव वेळ आदी सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील बदल राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. कोरोनामुळे दहावी-बारावीच्या परीक्षेत अभ्यासक्रमकपात करण्यात आली होती, ती कपातही रद्द झाल्याने आता राज्यातील विद्यार्थ्यांना १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा द्यावी लागणार आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षेसंदर्भात बदल करण्यात आलेल्या नव्या सूचना बुधवारी जाहीर केल्या आहेत. त्यामुळे कोरोनापूर्वीच्या नियमाप्रमाणेच फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये या परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे मंडळाकडून आज स्पष्ट करण्यात आले. यंदा २१ फेब्रुवारीपासून बारावी, तर २ मार्चपासून दहावीची परीक्षा होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक https://www.mahahsscboard.in/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे. दरम्यान, ८० गुणांच्या परीक्षेसाठी वाढीव अर्धा तास, तसेच ६०-४० गुणांसाठी अतिरिक्त १५ मिनिटे मिळणार नाहीत. परीक्षेसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती कायम राहणार आहेत.
संपूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा
फेब्रुवारी-मार्च २०२३ मधील दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा असणार आहेत. विद्यार्थ्याना प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांनी आर्धा तास आधी परीक्षा कक्षात उपस्थित राहावे लागेल. विभागीय मंडळाने नेमून दिलेल्या परीक्षाकेंद्रावरच विद्यार्थ्याना परीक्षा द्यावी लागणार.




















