जळगाव मिरर | ३१ मार्च २०२५
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना शहरापासून जवळ असलेल्या नशिराबाद उड्डाणपुलावर दुचाकीच्या भीषण अपघातात निंभोरा बुद्रुक तालुका रावेर येथिल जुळ्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. चैतन्य सुपडू फेगडे (वय २६ रा. निंभोरा ता. रावेर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक गावात राहणारा चैतन्य सुपडू फेगडे हा तरुण भाऊ चेतन, आई-वडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. घरकुल योजने संदर्भातची फाईल च्या कामानिमित्ताने चैतन्य हा जुळवा भाऊ चेतन आणि वडील यांच्यासोबत सोमवारी ३१ मार्च रोजी जळगावला निघाले. दरम्यान चैतन्यचे वडील रिक्षाने पुढे निघाले तर चेतन आणि चैतन्य हे दोघे भाऊ दुचाकी (क्रमांक एमएच १९ इइ १७०२) भुसावळकडून जळगावकडे येण्यासाठी निघाले. त्यावेळी जळगावपासून जवळ असलेल्या नशिराबाद गावातील उड्डाणपुलावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्यांची दुचाकी डिव्हायडर जोरदार धडकली या अपघातात चैतन्य याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ चेतन फेगडे हा गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडल्यानंतर नशिराबाद पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून जखमी झालेल्या चेतनला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या संदर्भात पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मयत चैतन्य हा एक वर्षापूर्वी रेल्वे विभागात नोकरीला लागलेला होता.तो पुणे (खडकी)रेल्वे स्टेशनला ट्रॅकमन या पदावर कार्यरत होता.