
जळगाव मिरर / ८ जानेवारी २०२३
गेल्या कित्येक वर्षापासून शहरातील काही प्रभागातील समस्या सुटण्याचे नावच घेत नाही. यामध्ये कुठेतरी नगरसेवक कमी पडत आहेत. तर कुठेतरी मनपाची प्रशासकीय कार्यपध्दती कमी पडत आहे. पण याचा त्रास मनपाचा कर भरत असलेल्या जनतेला सोसावा लागत आहे. हे मात्र निश्चितच. शहरातील प्रभाग क्रं. 1 मध्ये काही नागरिकांनी नगरसेवकांना फोन करून बोलवून घेत परिसरातील समस्या दाखविल्या आहेत. यावर आता नगरसेवक कितपत तत्काळ कामे करतात हे येत्या दोन दिवसात दिसणार आहे.
शहरातील प्रभाग क्रं.1 म्हणजेच दुध फेडेरशनसह गेंदालाल मिल पासून ते थेट राजाराम नगरपर्यंतचा परिसर या परिसरात गेल्या काही वर्षापासून नागरिकांना त्याच्या मुलभूत सुविधेपासून आजही वंचित रहावे लागत आहे. त्यातील काही भाग नविन जरी असला तरी मनपा या परिसरातून कर घेत आहे पण सुविधा देण्यास आजही अपात्र आहे. या परिसरातील हरिओम नगर, राधारमन अपार्टमेंट परिसरातील काही नागरिकांनी आज दि.8 जानेवारी रोजी सकाळी नगरसेवक ॲड.दिलीप पोकळे यांना बोलवून घेत त्यांच्या समोर समस्येचा महिलांसह पुरुषांनी पाढाच वाचला, त्यांनी यावर येथील नागरिकांना सांगितले आहे की, उद्या म्हणजे सोमवार दि.9 रोजीपासून या परिसरातील समस्या दूर करण्यासाठी मनपातील कर्मचारी पाठवून देतो असे आश्वासन दिले आहे.
या नागरिकांनी हे आश्वासन स्विकारले आहे. आता उद्या याठिकाणी नागरिकांच्या समस्या सुटतील म्हणून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यावेळी परिसरातील योगेश साळी, अरूण भालेराव, विजय कुलकर्णी, चेतन बडगुजर, पंकज खंडेलवाल, जितु सोनार, राजेश भोई, सुभाष घोरपडे, अशोक कोळी, संजय नन्नवरे यांच्यासह आदी नागरिक उपस्थित होते.




















