
जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२५
राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनामुळे राजधानीत वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सूचक टोला लगावला आहे.
ठाण्यातील दौऱ्यात पत्रकारांनी मराठा आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, मनोज जरांगे परत का आले, हे एकनाथ शिंदेंनाच विचारा. मागच्या वेळी जेव्हा ते नवी मुंबईत गेले होते, तेव्हा प्रश्न त्यांनीच सोडवल्याचे सांगितले होतं. मग आता पुन्हा आंदोलन का उभं राहिलं?” असं म्हणत त्यांनी शिंदेंनाच अप्रत्यक्षपणे जबाबदार धरलं.
दरम्यान, मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे राज्य सरकारवर वाढत असलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर सुमारे एक तासभर चर्चा झाली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली. महायुती सरकारमध्ये तीन वेगळे गट आहेत. शिंदे गट आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने मदत करत आहे, कारण त्यांचा उद्देश फडणवीसांना अडचणीत आणणं हाच आहे, असा थेट आरोप राऊतांनी केला.
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले होते. यामध्ये ते म्हणाले की, एकनाथ शिंदे साहेब हा माणूस खरा आहे. साथ देतो. जनतेची वेदना समजून घेतो. गोर-गरिबांच्या वेदना जाणून घेतो. सत्तेपेक्षा गोरगरिब जनतेच्या दुःखाला महत्त्व देणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे तर गरिबांचे प्रश्न जाणून घेऊन ताबडतोब सोडवायचे, जनतेचं म्हणणं ऐकून घ्यायचं हे काम तडकाफडकी अजित पवार करतात, असे त्यांनी म्हटले होते.




















