
जळगाव मिरर | ११ जून २०२४
राज्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. याचा अनेक नागरिकांना त्रासही होत आहे. अशातच आजही राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या काही भागात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचं IMD ने म्हटलं आहे. तर काही भागाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज राज्याच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल ते जाणून घेऊयात.
गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि साताऱ्याच्या काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आजही या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच काही भागात सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं प्रशासनाने म्हटलं आहे.
राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे. आज विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातही पुढच्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्याची राजधानी मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. शहरासह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे काही भागात पाणी भरण्याची घटना घडली आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रासाचा सामना करावा लागला. काल पुण्यातही पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागला. आजही या दोन्ही शहरांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून पोहोचला आहे, मात्र अजूनही मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना अद्याप मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे. याचे वेगाने मान्सून पुढे वाटचाल करत राहिला तर 13 ते 14 तारखेपर्यंत मान्सून मराठवाडा आणि विदर्भाचा बहुतांश भाग व्यापण्याची शक्यता आहे. यापूर्वी हवामान खात्याने 15 तारखेपर्यंत मान्सून मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात दाखल होऊ शकतो असा अंदाज वर्तवला होता. परंतु आता त्यापूर्वीच मान्सून या भागात पोहोचण्याची शक्यता आहे.




















