जळगाव मिरर | ११ सप्टेंबर २०२५
अमळनेर तालुक्यातील लोण खुर्द येथील तरुण शेतकऱ्याने कर्जाचा बोझा व नापिकीला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ रोजी घडली. लोण खुर्द येथील समाधान विजय पाटील (वय ३६) यांच्याकडे साधारण दोन बिघे शेती होती. घरातील आर्थिक स्थिती द्रारिद्रयाची असून अत्यल्प शेतीवर प्रपंच भागत नसल्याने त्यांना बाहेर कामाला जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
दरम्यान, ९ रोजी दुपारी समाधान पाटील हे घरी नसल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता लोण खुर्द शिवारातील उमेश पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ त्यांना त्यांची चप्पल आढळून आली. त्यानंतर काहि ग्रामस्थांनी विहिरीत उतरून त्यांचा मृतदेह बाहेर काढला व शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हे. कॉ. सुनील पाटील करत आहेत. सततची नापिकीमुळे त्यांच्यावरील कर्जाचा बोझा वाढला होता. त्यांच्यावर खासगी फायनान्स कंपनी, हात उसनवारी व इतर कर्ज होते, त्यातूनच उद्दिग्न होऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.