
जळगाव मिरर | २६ मार्च २०२६
जळगाव शहरात वर्षभरापूर्वी दाखल केलेली केस मागे घेण्याच्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नितीन नाना काळे (वय ३५, रा. जैनाबाद) यांचा संशयित श्याम तुकाराम सूर्यवंशी (रा. दिनकर नगर) याने चॉपरने वार करत खून केला. या घटनेनंतर पोलिसांनी संशयिताची धिंड काढत परिसरात त्याच्या दहशतीला लगाम घालण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन काळे हे गोवा येथे कामानिमित्त वास्तव्यास होते. मित्राचा साखरपुडा आणि न्यायालयीन तारखेच्या निमित्ताने ते जळगावात आले होते. २२ मार्च रोजी दुपारी नितीन घरी असताना संशयित श्याम सूर्यवंशी त्यांना दुचाकीवरून सोबत घेऊन गेला. त्यानंतर वर्षभरापूर्वी दाखल केलेली केस मागे घेण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.
वाद चिघळल्याने नितीन यांनी केस मागे घेण्यास नकार दिला. संतप्त झालेल्या संशयिताने धारदार चॉपरने नितीन यांच्या पोटात वार करत त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
संशयित श्याम सूर्यवंशी हा पोलिसांच्या नोंदीवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. त्याच्या वाढत्या दहशतीमुळे शनिपेठ पोलिसांनी बुधवारी (दि. २५) जैनाबाद व दिनकर नगर परिसरातून त्याची धिंड काढली. या कारवाईत पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, उपनिरीक्षक शंकर खेडकर तसेच गुन्हे शोध पथकातील कर्मचारी व होमगार्ड सहभागी होते.
दरम्यान, संशयिताविरुद्ध यापूर्वी २०१४, २०२०, २०२३ आणि २०२५ या वर्षांत शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल होते. त्याच्या हद्दपारीसाठी शनिपेठ पोलिसांनी १४ मे २०२५ रोजी प्रस्तावही पाठविला होता. मात्र, प्रांत कार्यालयाने गुन्ह्यांमध्ये गंभीरता नसल्याचे कारण देत २९ सप्टेंबर २०२५ रोजी हा प्रस्ताव फेटाळला होता.
जर त्यावेळी हद्दपारीची कारवाई झाली असती, तर आज एका निष्पाप तरुणाचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.




















