पुणे : आज दुपारी १० वीचा निकाल जाहीर झाला. या वर्षी एकूण 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर यंदाही सालाबादप्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल हा 99.27 टक्के इतका लागला. उल्लेखनीय बाब म्हणजे 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी १००टक्के मार्क मिळवले.
मेरिटमध्ये येणाऱ्या, शाळेतून, तालुक्यातून, जिल्ह्यातून आणि राज्यातून पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांची एकच हवा असते. त्याचं सर्वत्र कौतुक होत असतं. मात्र अभ्यासासोबत घराची जबाबदारी सांभाळणारे विद्यार्थी फारच क्वचित असतात. या अशा गुणवंत विद्यार्थ्यांना पुण्याती शुभम जाधव पुरून उरला आहे. विषयही तसाच आहे.
शुभमने करिष्मा केलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शुभम प्रत्येक विषयात ३५ गुण मिळवत पास झालाय. त्यामुळे शुभमची एकच चर्चा सुरु झाली आहे.
काठावर पास तरीही समाधानी
आतापर्यंत अपेक्षित टक्के मिळाले नाही म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी टोकाचं पाउल उचलत आयुष्य संपवलं. शुभमला ३५टक्के मार्क मिळाले, मात्र त्यानंतरही तो समाधानी आहे. आपल्याला 35 टक्के गुण मिळाल्याची खंत शुभमला नाही. त्याला मिळालेल्या गुणांमध्ये तो समाधानी आहे.
स्पर्धेच्या जगात आवश्यक असलेली हुशारी शुभमने कमी वयातच आत्मसात केली आहे. शुभमने हार्डवेअरच्या दुकानात काम करत त्यानं हे यश मिळवलंय.
दुसरं म्हणजे ढोल ताशा असो वा खेळ असं सगळं करत तो पास झालाय. याहीपुढे जाऊन 12 वीच्या परीक्षेत चांगल्या मार्कानी पास होण्याचं त्यानं ठरवलंय.




















