फैजपूर : प्रतिनिधी
आपण नेहमी पाहत असाल सासू व सासरे यांचे कोणत्याही विवाहितेशी जास्त जमत नसते. कुठल्याना कुठल्यविषयावरून वाद नेहमी उदभवत असतातच परंतु आजही माणुसकी शिल्लक आहे ती या घटनेमुळे समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सौ.शैलजा व किशोर मोतीराम चौधरी मूळ रहिवासी आमोदा ता यावल ह.मु. वापी (गुजरात) यांचा मोठा मुलगा चि. मयूर (बी.ई. इंजिनीयर) आणि कै. आशा व वसंत इच्छाराम महाजन, रा. खेडी, तालुका रावेर, ह. मु. नाशिक यांची कन्या शीतल (बी. कॉम) यांची रेशीम गाठ बांधून ३० मे २०२१ ला कोरोना काळामध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये अतिशय सुरेख पद्धतीने विवाह संपन्न झाला.
मयूर व शितल यांनी आपला संसार अतिशय प्रेमाने सुरू केला. त्यात शितल ला आपले सासू व सासरे यांचेही प्रेम लाभले. हा सुरू असलेला प्रेमळ संसार नियतीला मान्य नव्हता आणि आणि अवघ्या ४२ दिवसात म्हणजेच १२ जुलै २०२१ रोजी Ronch Polymer कंपनीमध्ये केमिकलच्या स्फोटांमध्ये चिरंजीव मयुर गंभीररीत्या जखमी झाला आणि दवाखान्यामध्ये उपचार घेत असताना दिनांक १७ जुलै २०२१ रोजी काळाने झडप घालून मृत्यूने त्याला कवटाळले. त्याच्या जाण्याने दोघांच्या नुकत्याच फुललेल्या संसाराची प्राणज्योत मालवली. या ४७ दिवसांमध्ये सासू आणि सासरे यांच्या कडून मिळालेले प्रेम हे आई वडिलांच्या प्रेमापेक्षाही किंचित काकणभर सरसच होते. त्यामुळेच ती आपल्या वडीलांकडे न जाता सासू-सासरे यांच्याकडेच राहिली. सासू-सासर्यांनी सुद्धा तिला सुन न मानता जन्मदात्या मुलीप्रमाणे तिला वागणूक दिली. मुलीचे वय कमी असल्यामुळे त्यांनी तिचा पुनर्विवाह करून देण्याचे ठरविले अर्थात तिच्या मनाप्रमाणेच.
शेवटी तो तिच्या भाग्याचा दिवस उजाडला आणि सौ संगीता व रेवा भगवान धांडे राहणार रोझोदा तालुका रावेर यांचा मुलगा चिरंजीव भूषण ( हेमराज ) व शीतलचा विवाह दि.२४ एप्रिल २०२२ रोजी रोझोदा येथे अगदी साध्या पद्धतीने झाला. शीतलचा विवाह करून देऊन सासू-सासर्यांनी निभावले आई वडिलांचे कर्तव्य. या आदर्श विवाहाला जळगावचे विनय भास्कर पाटील, पालघर चे उमकांत पुरुषोत्तम लोखंडे ,भुसावळचे मनोज पंडित पाटील, आमोदा येथील भागवत दामोदर पाटील, भोजराज लोखंडे, हितेश बोंडे फैजपूर यांचे अनमोल सहकार्य लाभले.




















