
जळगाव मिरर । ९ ऑगस्ट २०२३
जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यापासून अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची प्रकरण घडत असताना अशीच एक घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आपली चक्रे फिरवीत तीन संशयित आरोपीना बेड्या ठोकल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून नजीक असलेल्या शिरसोली गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. त्यावरून मुलीला पळवून नेणारा विकास दौलत बारी याच्याविरुध्द २५ जुलै रोजी अपहरणाचा गुन्हा करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, पोहेकॉ रतीलाल पवार हे करीत होते. त्यानंतर पोलिसांनी आपली चक्रे फिरवीत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, पोहेकॉ रतीलाल पवार, पोकॉ अर्चना गायकवाड यांच्या पथकाने सुरत येथे जावून विकास दौलत बारी व अल्पवयीन मुलीचा शोध घेवून ८ ऑगस्ट रोजी रात्री ताब्यात घेतले. दोघांना विचारपूस केली. त्यांना भाडेतत्वावर खोली घेवून देणारा व त्यांना सहाय्य करणारा सागर अनिल बारी यास ताब्यात घेतले. त्यांना घेवून पथक जळगावला आले. त्यानंतर सदर पीडिताचा जबाब नोंदविला असता अल्पवयीन मुलगी व विकास बारी यांना पळवून जाण्यास दुचाकीवरून पाचोरा येथे सोडणारा गणेश अशोक अस्वार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदर गुन्ह्यात वाढीव कलम लावण्यात आले आहे. सदर आरोपीसदेखील गुन्ह्यात सहाय्य केल्याने त्याची दुचाकी जप्त करण्यात आली व त्याला अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी आता सागर अनिल बारी (२४, रा. लक्ष्मणनगर, नवागाव दिंडोली, सुरत) याच्यासह पळून जाण्यास मदत करणारा गणेश अशोक अस्वार (२२, रा. शिरसोली प्र.बो., ता. जळगाव) यांनाही ताब्यात घेऊन कलम वाढवून तिघांना अटक करण्यात आले.





















