जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२५
आई-वडील जामनेरला गेलेले असताना कुणाल दत्तात्रय पाटील (वय १९, रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तरुणाने राहत्या घराच्या दुस-या मजल्यावर गळफास घेवून जीवनयात्रा संपवली. ही दुर्देवी घटना बुधवार दि. २६ रोजी दुपारच्या सुमारास कुसुंबा गावात घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नसून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात कुणाल पाटील हा आई-वडील आणि लहान भावासह वास्तव्यास होता. कुणाल याचे वडील मालवाहू वाहन चालवून कुटूंबांचा उदरनिर्वाह करतात. त्यांना हातभार लागावा म्हणून कुणाल याने शिरसोली रस्त्यावर पोल्ट्री फॉर्म सुरू केले होते. कधी-कधी तो वडीलांसोबत मालवाहतूक वाहनांवर पाण्याचे जार वाटप करण्याचेही काम करायचा. बुधवारी सकाळी आई-वडील काही कामानिमित्त जामनेरला गेले होते. त्यामुळे कुणाल आणि त्याचा लहान भाऊ हे दोघं घरीच होते. सकाळी जार वाटप केल्यानंतर दुपारी मित्रांसोबत त्याने वेळ घालविला.
दुपारी मित्रासोबत त्याने गावात चहा देखील पिला. त्यानंतर तो घराकडे निघाला. घरी आल्यानंतर कुणाला हा दुस-या मजल्यावर गेला. दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याने छताला दोरीच्या सहायाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. कुणालचा लहान भाऊ हा खालच्या खोलीत होता. दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास जवळच राहणारी कुणाल याची आत्या ही कुणालला शोधत दुस-या मजल्यावर गेली, तेव्हा त्यांना कुणाला हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांना धक्काच बसला.
कुणालच्या आत्याने आक्रोश करताच कुणालच्या भावासह परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांनी कुणाल याला खाली उतरवून तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांसह मित्र मंडळींची एकच गर्दी झाली होती. आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
