
जळगाव मिरर | २१ ऑगस्ट २०२५
यावल शहरात राष्ट्रीय महामार्गावर दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 1.00 वाजेच्या सुमारास धक्कादायक जबरी चोरीची घटना घडली. रोहित प्रकाश रल (वय 24 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. चोपडा) हे त्यांच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप मालवाहतूक गाडीतून रावेरहून चोपडा मार्गे यावल शहरातील बुरुज चौकातील ब-हाणपुर जलेबी सेंटर समोरून जात होते. त्याचवेळी त्यांच्या वाहनासमोर अचानक दोन अनोळखी इसमांनी येऊन गाडी थांबवली.
सदर इसमांनी रोहित यांच्या गाडीच्या डॅशबोर्डमधून रोख ₹5000 आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावली. यावेळी तक्रारदाराला चापटा-बुक्क्यांनी मारहाण करत, धमकावत दोन्ही चोरटे घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकारामुळे घाबरलेल्या रोहित यांनी लगेचच यावल पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. याप्रकरणी यावल पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 342/2025 भारतीय दंड संहिता कलम 309(4), 309(6), 3(5) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला.
घटना राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी घडलेली असल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी तपास अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित नागरिकांची विचारपूस, गुप्त माहिती आणि इतर तपशीलांच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून आणि विशिष्ट तपासयंत्रणेच्या मदतीने, दोन आरोपींचा तपास लागला. यातील समशेर शहा सलीम शहा (वय 27, रा. बाहेरपुरा यावल, मूळ रा. पंचशीलनगर, भुसावळ) याला गेंदालाल मिल परिसर, जळगाव येथून अटक करण्यात आली. त्याचा साथीदार समीर रहमान तडवी (वय 22, रा. तडवी कॉलनी, यावल) यालाही यावलमधून अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम ₹5000 हस्तगत करण्यात आली आहे. यातील समशेर शहा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ येथे जबरी चोरी, घरफोडी, चोरी व विनयभंग-अॅट्रोसिटीसारखे गुन्हे आधीच नोंदलेले आहेत.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, पोहेकॉ वासुदेव मराठे, पोहेकॉ निलेश चौधरी, पोना अमित तडवी, पोकॉ अर्षद गवळी, पोकॉ ऐजाज गवळी, पोकॉ अनिल साळुंखे, आणि पोकॉ सागर कोळी (सर्व यावल पोलीस स्टेशन) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.




















