
जळगाव मिरर | ३१ ऑगस्ट २०२५
जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या आरोपाला दोन दिवस उलटून गेले तरी देखील ती महिला तक्रार देण्यासाठी पुढे आलेली नाही. तर यावेळी आ.चव्हाण यांनी जळगाव शहरातील मणियार बंधू यांच्यावर देखील आरोप केले होते. त्या दोन बंधूना देखील जळगाव पोलिसांनी चौकशीसाठी मिळून आलेले नाही. त्यामुळे हे प्रकरण आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे. आयुष व पियुष मणियार या दोन युवकांना शस्त्र परवाना प्रदान करण्यात आला असून विशेष म्हणजे, यापूर्वी स्थानिक पोलिस प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांच्या परवान्याला नकार देण्यात आला होता. मात्र, प्रशासनात बदल झाल्यानंतर पुन्हा अर्ज सादर करत त्यांना शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी 2023 मध्ये शासनाकडे याविरोधात तक्रार सादर केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, शस्त्र परवाना देण्यासाठी आवश्यक धोका किंवा गरज या बाबींचे समाधानकारक कारण त्या वेळी सिद्ध झाले नव्हते. त्यामुळे पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी परवाना नाकारला होता. तथापि, प्रशासनात नवीन अधिकारी रुजू झाल्यानंतर मणियार बंधूंनी नव्याने अर्ज सादर केला आणि नवीन पोलिस व जिल्हा प्रशासनाकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दोघांना शस्त्र परवाना देण्यात आला. या प्रक्रियेत नियमांचे पालन झाले की नाही, याची चौकशी व्हावी, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
यासंदर्भात माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, शस्त्र परवाना अर्ज प्रक्रियेत कोणताही जीवधोक्याचा संदर्भ अथवा समाजहितासाठी आवश्यक कारणे पुरेशा प्रमाणात नोंदवलेली नव्हती, असा दावा काही कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांनी हा मुद्दा शासन दरबारी पुन्हा उपस्थित केला असून, परवान्याच्या पुनरविचाराची मागणी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. शस्त्र परवाना देताना कायदेशीर प्रक्रिया आणि धोरणांचे पालन झाले आहे का, हे स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे अनेकांचे मत आहे.




















