
जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२५
गेल्या काही चार दिवसापासून मुंबई शहरातील आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत आहे. मात्र आजपासून त्यांनी पाणी देखील न पिण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
काल डॉक्टरांच्या टीमने त्यांची तपासणी करत पाणी जास्त पिण्यास सांगितले आहे. तसंच ओआरएस घेण्यास सांगितले आहे. सध्या मनोज जरांगे यांची शुगर ही ७०च्या आसपास आहे. त्यामुळे त्यांनी पाणी त्याग केले तर त्यांची प्रकृती आणखी खालावू शकते, असे डॉक्टरांच्या टीमकडून सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे, मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आझाद मैदानामध्ये लाखो मराठा बांधव दाखल झालेला आहे. मराठा बांधवांची दोन दिवस गैरसोय झाली होती. त्यानंतर राज्यभरातून मराठा बांधव उपाशी राहू नये यासाठी भाकरी आणि ठेचा पाठवण्यात आला आहे.
तसेच बिस्किट, पाण्याची बॉटल, कडधान्यासह अनेक जीवनावश्यक वस्तू हे सर्व पाठवण्याचे काम करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी मराठवाड्याच्या नांदेड वरून आलेल्या मराठा बांधवानी चर्चगेट रेल्वेस्थानकावर आश्रय घेतला. रात्रभर हे आंदोलक रेल्वे स्थानकात चटई टाकून स्थानकाच्या पॅसेजमध्ये एका लाईनमध्ये झोपले होते. दरम्यान, कितीही अडचणी आल्यातरी आंदोलक मराठा आरक्षणावर ठाम आहेत.




















