जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२५
आईसोबत गप्पा मारत असताना अचानक घराच्या मागच्या खोलीमध्ये जाऊन विजय हिरामण अहिरे (वय ३५, रा. नाथवाडा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नाथवाडा परिसरात विजय अहीरे हे वास्तव्यास होते. मजुरी काम करुन ते आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. रविवारी दुपारी त्यांनी आईसोबत टीव्ही पाहत बसले होते, त्यानंतर त्यांनी आईसोबत गप्पा देखील मारल्या. काही वेळानंतर घराच्या मागील खोलीमध्ये जावून त्यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. बराचवेळ झाला तरी देखील मुलगा बाहेर न आल्यामुळे त्यांची आई बोलवायला गेली असता, त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. हे दृष्य पाहून आईला मोठा धक्का बसला. त्यांनी शेजारील मंडळींना ही माहिती दिली. त्यानंतर तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.