जळगाव मिरर | १७ सप्टेंबर २०२५
शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरात उभारण्यात आलेल्या कचरा संकलन केंद्राविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विद्यार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात आले. विद्यार्थ्यांसह नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत मनपाच्या निष्काळजी धोरणाविरोधात संताप व्यक्त केला.
मनसे पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “कचरा केंद्रामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. उघड्यावर कचरा साठवल्यामुळे माशा, डास, उंदीर यांचा उपद्रव वाढून विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे सरळसरळ उल्लंघन होत असून, मनपाच्या निष्काळजीपणाला नागरिक कंटाळले आहेत.”
सदर ठिकाणी शासकीय तंत्रनिकेतनसारखी प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था असल्याने विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक आहे. मात्र कचरा संकलन केंद्रामुळे या मूलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा आरोप मनसेने केला. स्थानिक नागरिकांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविताना सांगितले की, आम्ही यापूर्वी अनेकदा तक्रारी केल्या तरी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. मुलांचे शिक्षण व आरोग्य धोक्यात घालणारी ही परिस्थिती सहन केली जाणार नाही. मनसेने स्पष्ट इशारा दिला आहे की, कचरा संकलन केंद्र तातडीने व कायमस्वरूपी बंद करण्यात आले नाही, तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करून उग्र आंदोलन छेडले जाईल. “याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेवर राहील,” असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियान चालविणाऱ्या संस्थेनेच शहराच्या मुख्य रस्त्यावर कचऱ्याचा ढीग लावणे ही जळगावकरांसाठी लज्जास्पद बाब असल्याची भावना आंदोलनात व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष किरण तळेले,विनोद शिंदे, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे,ललित शर्मा,रज्जाक सय्यद,प्रकाश जोशी,शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील,दीपक राठोड,प्रदीप पाटील,भूषण ठाकूर,राहुल चव्हाण,विशाल जाधव,महिला सेनेच्या अनिता कापुरे,लक्षी मोरे यांच्यासह शासकीय आयटीआय मधील सर्व शिक्षक वर्ग व दोनशे विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान महानगरपालिका आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी प्रत्यक्ष येऊन भेट दिली व दहा दिवसांमध्ये याच्यावर तोडगा काढून असे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन दहा दिवसाकरिता स्थगित करण्यात आले आहे.