जळगाव मिरर | २४ फेब्रुवारी २०२६
जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे सौ. सुनीता येवले लिखित ‘माह्य आंगन’ या लेवा गणबोलीतील काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या काव्य संग्रहाचे प्रकाशन भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक माननीय प्रा.डॉ म. सु. पगारे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून पिंपळनेर (ता. साक्री) येथील प्रा. डॉ. सतीश म्हस्के उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मातृभाषेचे महत्त्व, साहित्यनिर्मितीतील स्थानिक बोलींची भूमिका आणि नवोदित कवी-लेखकांनी आपल्या मातृभाषेतून अभिव्यक्त होण्याची गरज यावर सखोल विवेचन केले.
जेष्ठ साहित्यिक श्री अरविंद नारखेडे सर, सौ जयश्री काळवीट मॅडम ‘ यांनी ‘माह्य आंगन’ या कवितासंग्रहातील भावविश्व, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन आणि स्त्रीमनाचे सूक्ष्म चित्रण याचे विशेष कौतुक केले.सुनिता येवले यांचा हा काव्यसंग्रह म्हणजे लेवागणबोलीतील अमूल्य शब्दांचा महत्वपूर्ण दस्तऐवजच आहे असे काळवीट मॅडम म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. म. सु. पगारे हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी जागतिक मातृभाषा दिनाचे महत्त्व अधोरेखित करत मातृभाषेच्या संवर्धनासाठी अशा साहित्यिक उपक्रमांची गरज व्यक्त केली. ‘ ‘ ‘ ‘ मह्य आंगन ‘ बद्दल बोलतांना सरांनी काव्य संग्रहातील कवितोसोबत त्यात दिलेल्या लेवागणबोलीतील शब्दांचे प्रमाण भाषेत अर्थ व काव्यानुरूप सुंदर चित्र रेखाटनाचे कौतुक केले. बोली भाषांमधून दर्जेदार लिखाण होत राहीले पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली.या प्रकाशन सोहळ्यास आम्ही सिध्दलेखिका संस्थेच्या खान्देश विभाग प्रमुख प्रा.संध्या महाजन, श्री तुषार वाघुळदे, श्री झांबरे सर, श्री पी झेड नारखेडे, सौ रंजना भंगाळे, श्री विनोद अढळके , प्रेम बडगुजर, भुषण अमोदेकर, तृप्ती शिर्के, ज्योती खरे व इतर मान्यवर, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ भारती सोनवणे यांनी केले तर आभार महेश सूर्यवंशी यांनी केले.




















