
जळगाव मिरर | १७ एप्रिल २०२६
शहरातील एमआयडीसी परिसरात गुरुवारी सकाळी एका तरुणाने तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, परिसरातील कंपनीत कार्यरत असलेल्या मजुरांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार उघडकीस आला आणि संभाव्य अनर्थ टळला. पोलिस तपासात हा प्रकार प्रेमप्रकरणातून उद्भवलेल्या वादातून घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी सकाळी सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुण चारचाकी वाहनाने एमआयडीसी परिसरात आला. रस्त्याने जात असलेल्या एका तरुणीला त्याने अडवून तिला जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. या वेळी तरुणीने प्रतिकार केल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा प्रकार पाहताच जवळील एका कंपनीतील मजूर तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी संबंधित वाहन अडवून तरुणाला जाब विचारला. सुरुवातीला तरुणाने “ही माझी पत्नी आहे” असे सांगून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मजुरांनी तरुणीकडे विचारणा केली असता ती घाबरून रडू लागली. तिच्या हातावर जखमांच्या खुणा दिसून आल्याने उपस्थितांचा संशय अधिकच बळावला.
त्यानंतर मजुरांनी तत्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांना ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले. चौकशीत दोघे पती-पत्नी नसून त्यांच्या मध्ये प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. काही कारणावरून झालेल्या वादाच्या रागातून तरुणाने हा अविचारी प्रकार केल्याची कबुली दिली.
या प्रकरणात विशेष म्हणजे, तरुणी किंवा तरुण या दोघांनीही एकमेकांविरुद्ध कोणतीही लेखी तक्रार देण्यास नकार दिला. तरीही, सार्वजनिक ठिकाणी कायदा हातात घेतल्याप्रकरणी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत दोघांनाही समज देत नोटीस बजावली आहे.
दरम्यान, बुधवारी जिल्हा उद्योग केंद्राजवळील महाविद्यालयासमोरही अशाच प्रकारची एक घटना घडली होती. कारमधून आलेल्या तरुणाने तरुणीला पळवून नेल्याने परिसरात अपहरणाची चर्चा रंगली होती. मुलीला अडवण्याच्या प्रयत्नात तिची आई काही अंतर कारसोबत फरफटत गेल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिस तपासात संबंधित तरुण-तरुणीने कायदेशीर विवाह केल्याचे स्पष्ट झाले. दोघेही संरक्षणासाठी पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर या नाट्यमय प्रकरणाचा शेवट झाला. या सलग घटनांमुळे शहरात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





















