जळगाव मिरर | 10 ऑगस्ट 2026
इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी धुळे येथे रेल्वेने जात असलेल्या १९ वर्षीय तरुणाचा चाळीसगाव तालुक्यातील जामदा रेल्वेस्थानकावर दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेगाडी थांबण्याच्या बेतात असताना प्लॅटफॉर्मवर पडलेला मोबाईल घेण्यासाठी उतरण्याचा प्रयत्न करत असताना पाय प्लॅटफॉर्म आणि रेल्वेगाडीच्या मध्ये अडकल्याने पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील रहिवासी यश गणेश पाटील (वय १९) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ही घटना ८ ऑगस्टला सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत चाळीसगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने तारखेडा गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील यश पाटील हा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी धुळे येथील महाविद्यालयात जाण्यासाठी शनिवारी सकाळी रेल्वेने प्रवास करत होता.
पाचोऱ्याहून सेवाग्राम एक्स्प्रेसने चाळीसगाव येथे आल्यानंतर तो चाळीसगाव ते धुळे मेमूने जात होता. सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मेमू जामदा रेल्वेस्थानकावर थांबण्याच्या बेतात असताना दरवाजाजवळ उभ्या असलेल्या यशच्या हातातील मोबाईल प्लॅटफॉर्मवर पडला. पडलेला मोबाईल घेण्यासाठी त्याने गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचे दोन्ही पाय प्लॅटफॉर्म व रेल्वेगाडीच्या मध्ये अडकले. अवघ्या काही क्षणांत घडलेल्या या दुर्घटनेत यशच्या पायांना गंभीर इजा झाली. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिकेतून गंभीर जखमी यशला मेहुणबारे येथील रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
यश हा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी धुळे जात होता. वडिलांनी यशला उद्या जाण्याचा सल्ला दिला होता; मात्र प्रवेशासाठी त्याने त्याच दिवशी जाण्याचा निर्णय घेतला. त्याला रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी त्याचे वडीलच पाचोरा येथे आले होते. त्यानंतर काही वेळातच ही दुर्दैवी घटना घडली. यश हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. उच्च शिक्षण घेऊन उज्वल भवितव्य घडवण्याचे त्याचे स्वप्न या दुर्दैवी अपघातामुळे अधुरेच राहिले. ही माहिती मिळताच पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.




















