
जळगाव मिरर | १७ एप्रिल २०२६
शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि सुरक्षित मानला जाणाऱ्या जिल्हाधिकारी निवासस्थान परिसरात बुधवारी (१५ एप्रिल) सायंकाळी साखळीचोरांनी धाडसी हात साफ करत सेवानिवृत्त महिलेच्या गळ्यातील सुमारे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
रिंगरोड परिसरात राहणाऱ्या नीलिमा विश्वासराव पाटील (वय ६६) या सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. नेहमीप्रमाणे त्या बुधवारी सायंकाळी फिरण्यासाठी भाऊंच्या उद्यानात गेल्या होत्या. सायंकाळी सुमारे ७.३० वाजता त्या पायी घरी परतत असताना, पाठीमागून एका दुचाकीवरून दोन अज्ञात इसम वेगाने त्यांच्या जवळ आले.
दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने क्षणात त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र पकडून जोरात ओढले. या अचानक झालेल्या प्रकारामुळे पाटील या घाबरल्या, तरीही त्यांनी धैर्य दाखवत चोरट्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांनी त्यांच्या हाताला झटका देत बळजबरीने मंगळसूत्र तोडले आणि क्षणार्धात दुचाकीवरून पसार झाले.
घटना घडलेला जिल्हाधिकारी निवासस्थान परिसर तसेच काव्यरत्नावली चौक हा भाग सायंकाळच्या वेळी ‘शतपावली’ करणाऱ्या नागरिकांनी गजबजलेला असतो. अशा वर्दळीच्या आणि शासकीय निवासस्थानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या भागात चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
दरम्यान, नीलिमा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





















