
जळगाव मिरर | १८ एप्रिल २०२६
मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बोरगाव परिसरात शुक्रवारी पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे वरणगावसह दर्यापूर शिवार परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात श्याम विक्रम ठाकूर (४५), शोभा विक्रम ठाकूर (६०) आणि अवघ्या ५ वर्षीय शिवन्या श्याम ठाकूर यांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूर कुटुंबीय उज्जैन, ओंकारेश्वर आणि सिहोर येथे धार्मिक दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते आपल्या मूळ गावी परत येत असताना हा अपघात घडला. पहाटेच्या सुमारास वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन विविध रुग्णालयांत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. अपघातात कारचालक श्याम ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शोभा ठाकूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. लहानगी शिवन्या हिला बऱ्हाणपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचार सुरू असतानाच तिचाही मृत्यू झाला. या अपघातात चार भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, सलग घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दर्यापूर शिवारातील गणेश नगर आणि वरणगाव फॅक्टरी परिसरात या घटनेची माहिती पोहोचताच शोककळा पसरली. ठाकूर कुटुंबाच्या घरी नातेवाईक आणि शेजाऱ्यांची मोठी गर्दी झाली असून आक्रोशाचे दृश्य पाहायला मिळत आहे. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





















