
जळगाव मिरर | २० एप्रिल २०२६
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून उसळलेल्या वादाने शनिवारी दि.18 रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास थेट हिंसक रूप धारण करत रिक्षाचालक दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना वरणगाव येथे घडली. काही क्षणांतच वादाचे रूपांतर जमावाच्या हल्ल्यात झाले आणि परिसरात भीतीचे सावट पसरले. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी नाजीम गोगाशेठ, अज्जुबाबा, लाला पठाण यांच्यासह ५ ते ६ अज्ञात व्यक्तींविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आहे.
तक्रारदार दिलीप हरी चौधरी (वय ५२, रा. भवानी नगर, सिनेमा रोड) हे रिक्षाचालक असून कुटुंबासह वरणगाव येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोर नजीक राहणाऱ्या नाजीम गोगाशेठ याने चारचाकी वाहन उभे केले होते. चौधरी यांनी शांतपणे “नळाचे पाणी वाहनावर पडेल” असे सांगत गाडी दुसरीकडे लावण्याची विनंती केली. मात्र या साध्या सूचनेवरून नाजीम संताप आला आणि त्याने शिवीगाळ करत थेट मारहाण सुरू केली. पतीला वाचवायला गेल्यावर पत्नीवरही हल्ला मारहाणीचा आवाज ऐकून पत्नी सरला चौधरी पतीला वाचवण्यासाठी पुढे आल्या. मात्र आरोपींनी त्यांनाही बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून चेहऱ्यावर सूज आली आहे. घटनेदरम्यान अज्जुबाबा आणि लाला पठाण हेही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनीही मारहाणीत सहभाग घेतला. काही वेळातच ५ ते ६ जणांचा जमाव तेथे जमा झाला आणि त्यांनी दाम्पत्याला घेरून बेदम मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली.
या गोंधळात सरला यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळ्यांची सोन्याची माळ तुटून हरवली किंवा नुकसान झाली. त्यामुळे या घटनेत शारीरिक जखमांसह आर्थिक फटकाही बसला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी दाम्पत्याला मदत करून तक्रारीच्या आधारे संबंधित ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन जळगावचे अप्पर पोलिस अधीक्षक संदीप गावीत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी भुसावळ तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले, पोलिस निरीक्षक राहुल वाघ आणि आशिषकुमार आडसूळ यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी तत्परतेने जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास वरणगाव पोलिस ठाण्याचे अमितकुमार बागुल आणि उपपोलिस निरीक्षक मंगेश बेंडकोळी करत आहेत. जळगाव दंगा नियंत्रण पथकही परिसरात तैनात आहे.





















