
जळगाव मिरर | २० एप्रिल २०२६
तालुक्यातील बोरणार गावाजवळ जुन्या वादातून एका १९ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दि. १७ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम गोपाल धनगर (वय १९, रा. बोरणार, ता. जळगाव) हा तरुण दि. १७ रोजी रात्री दुचाकीने म्हसावद येथून आपल्या गावी परतत होता. बोरणार गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल स्वराज्यजवळ संशयित राकेश पाटील आणि गजा कोळी यांनी त्याला अडविले.
दोन्ही संशयितांनी प्रेम धनगर याला दुचाकीवरून खाली उतरवून जुन्या वादातून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद चिघळताच राकेश पाटील याने आपल्या जवळील धारदार चाकू काढून प्रेम धनगरच्या कमरेवर वार केला. या हल्ल्यात प्रेम गंभीर जखमी झाला. त्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अवस्थेत प्रेम धनगर याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
या घटनेला अवैध धंद्यांची किनार असल्याची चर्चा गावात रंगू लागली आहे. बोरणार गावालगत काही ठिकाणी अवैध पत्त्यांचे क्लब सुरू असल्याची माहिती समोर येत असून, त्याठिकाणी झालेल्या वादातूनच हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, काही अवैध धंदे चालक आणि पोलिस यांच्यातील साटेलोटे असल्याच्या चर्चांमुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, परिसरातील वाढत्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.





















