
मुंबई : वृत्तसंस्था
शिंदे फडणवीस सरकारने महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेत बदल केला होता. तर जिल्हापरिषदेतील वाढीव गट आणि गणात देखील बदल करण्यात आले होते. त्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा राबवण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी उलटणार असून त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या प्रक्रियेवर आणि आरक्षणाच्या प्रक्रियेवर दिलेल्या स्थगितीनंतर आता या निवडणुका पार पडण्यासाठी पुढचे वर्ष उजाडणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
राज्यातील 25 जिल्हा परिषद, महापालिका आणि पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातील परिपत्रक काढून माहिती दिली आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभमीवर जिल्हा परिषद, महापालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.
#राज्यनिवडणूकआयोग #निवडणूकआयोग #महराष्ट्र #elections #SEC #StateElectioncommission #Electioncommission#Election #StateElectioncommissionMaharashtra pic.twitter.com/ULdjIepq6x
— Maharashtra SEC (@MaharashtraSEC) August 5, 2022
दरम्यान, राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना आज जाहीर करण्यात येणार होती. पण निवडणूक आयोगाने निर्णय घेत जिल्हा परिषदांमधील जाहीर करण्यात येणार असलेली मतदार यादीची प्रक्रियाही स्थगित करण्यात आली असल्याचं राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकात म्हटलं आहे. त्याचबरोबर यासंदर्भातील सूचना सदर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
महापालिका निवडणुकाही स्थगित
महापालिकेतील सदस्य संख्येतील बदल करणारा आणि आरक्षणाची प्रक्रिया रद्द करणारा निर्णय काल शिंदे फडणवीस सरकारने घेतला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णय शिंदे सरकारने बदलला असून त्यावर निर्णय घेत राज्य निवडणूक आयोगाने तातडीने निर्णय घेत या सर्व निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.




















