
चाळीसगाव : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राबविण्यात येत आहे. आपला देश जगात प्रथम क्रमांकावर मार्गक्रमण करीत आहे. हा अमृत काळ आपण सर्व अनुभवत आहोत. आज जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी. *या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी हर घर तिरंगा अभियान राबविले जात असून आजच्या “घरोघरी तिरंगा” रॅली उपक्रमातून देशभक्तीची आंतरिक प्रेरणा मिळते आहे असे प्रतिपादन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केले आहे. आज सकाळी आठ वाजता निघालेल्या *जिल्ह्यातील सर्वात मोठया तिरंगा रॅली प्रसंगी ते बोलत होते.
चाळीसगाव येथील हिरापुर रोड वरील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण महाविद्यालयाच्या आवारात केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो जळगाव क्षेत्रीय शाखेच्या सहकार्याने तसेच खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या सुचनेने शहरातील सर्व शाळांमधील आठवी, नववी व दहावीच्या हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली रॅली काढण्यात आली. *याप्रसंगी व्यासपीठावर प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, राज्य प्रबंधक संतोष देशमुख, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, शहर पोलीस निरीक्षक के के पाटील, क्षेत्रीय अधिकारी प्रदीप पवार, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुवार, प्राचार्य डॉ.एस आर जाधव, गटशिक्षणाधिकारी विलास भोई, सहाय्यक गटविकास अधिकारी के एन माळी, सार्व. बांध. उपविभागीय अधिकारी सतीशराव सुपले, पं.स. उपसभापती भाऊसाहेब पाटील, एनएसएस प्रमुख डॉ. आर. पी. निकम, प्रा. डी. एल. वसईकर, उमंग समाजशिल्पी महिला परिवाराचे संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील, उमंगच्या अध्यक्षा साधना पाटील, प्रा. डॉ. योगिनिताई वाघ, अनिता शर्मा, समृध्दी शर्मा, पं.स.सदस्य रवींद्र चौधरी* आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या शुभहस्ते “भारत माता प्रतिमा” पूजन करण्यात आले. यावेळी पथनाट्यकार विनोद ढगे यांनी विविध पोवाडे देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. राष्ट्रीय कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी बहारदार नृत्य सादर करीत रीया पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रबंधक संतोष देशमुख यांनी तर आभार गटविकास अधिकारी विलास भोई यांनी मानले, सूत्रसंचालन भैय्यासाहेब वाघ यांनी केले. सर्व मान्यवरांचे क्षेत्रीय अधिकारी प्रदीप पवार यांच्या हस्ते वृक्षाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी *खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या शुभहस्ते तिरंगा रॅलीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात* करण्यात आली. राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणापासून शहरातील मुख्य मार्गे या रॅलीचे सांगता पोलीस कवायत मैदानावर करण्यात आली. *खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या वतीने विद्यार्थ्यांना पौष्टीक फळ केळीचे वाटप* करण्यात आले.
चाळीसगावात निघाली विद्यार्थ्यांची जिल्ह्यातील सर्वात मोठी तिरंगा रॅली
या रॅलीत शहरातील आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल, आनंदीबाई बंकट मुलींचे हायस्कूल, डॉ.काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालय, राष्ट्रीय मुलांचे माध्यमिक विद्यालय, राष्ट्रीय विद्यालय मुलींचे माध्यमिक विद्यालय, जयहिंद माध्यमिक विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा,स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, अग्लो उर्दू हायस्कूल, तहजीब उर्दू हायस्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, गुडशेफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूल, तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, नालंदा माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सुमारे 5000 विद्यार्थ्यांना तिरंगा झेंडे मोफत* देण्यात आल्याने या रॅलीने शहराचे वातावरण तिरंगामय झाले होते. *रॅलीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांची चित्रे प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आली होती
चाळीसगाव शहर तिरंगामय ; घोषणांनी दुमदुमले शहर
घरोघरी तिरंगा हा उत्सव प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा व समाजातील सर्वच स्तरातील लोकांचा देशाभिमान जागृत करणारा व स्वातंत्र्य संग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या विरांपासून प्रेरणा घेणारा असल्याने खासदार उन्मेश दादा पाटील यांच्यासह मान्यवरांनी विद्यार्थ्यांसह रॅली मध्ये शेवटपर्यंत पायी चालत सहभाग घेतला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तीत घोषणाबाजी करीत शहर दणाणून सोडले.




















