
धुळे : प्रतिनिधी
अंधश्रद्धा विकासाच्या मार्गातील अडथळा आहे, हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गेल्या ३३ वर्षात अधोरेखित केले आहे. विवेकाच्या आधारे निर्णय घेण्याची आपली क्षमता कायम आहे. राज्याच्या समाजसुधारणेच्या जडणघडणीत समितीचे प्रतिबिंब ठळकपणे उमटले आहे. आगामी काळात देखील अंधश्रद्धेसह धर्मांधता, जातपंचायत, फलज्योतिष आदी आव्हाने कायम राहणार आहे, असे प्रतिपादन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी संघटनेच्या ३३ व्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला ९ ऑगस्ट २०२२ रोजी ३३ वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्रातील संतांचा व समाजसुधारकांचा वारसा जाज्वल्यपणे जागृत ठेवून तो कृतिशीलपणे पुढे नेण्याचे अविरत अखंड संघर्षमय कार्य समितीचे कार्यकर्ते दर दिवशी, दरवर्षी जोमाने पुढे नेत आहेत. वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांचा कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रम सोमवारी रात्री ८ वाजता ऑनलाईन घेण्यात आला. कार्यक्रमाला राज्यभरातून ३५० पेक्षा अधिक कार्यकर्ते, समविचारी नागरिक उपस्थित होते.
सुरुवातीला प्रस्तावनेतून समितीची वाटचाल राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी विशद केली. प्रबोधन, संघटन, संघर्ष या तीन टप्प्यांवर आपण कायम पुढे गेलो. राज्यभरात प्रबळ जनआंदोलन उभे करण्यात अंनिसला यश आले आहे. नव्यांना संधी देत जोरकसपणे काम करीत आपण हि वाटचाल कायम ठेवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. यानंतर “मला अंनिसने काय दिले ?” या विषयी राज्यातील ३३ जिल्ह्यातील ३३ प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले.
मनोगतात कार्यकर्त्यानॆ भावपूर्ण मते मांडली. संवाद साधण्याचे कौशल्य मिळाले. विवेकी विचार जागृत झाला. व्यक्तिमत्व विकास होऊन वाचन-लेखनाची सवय लागली. मानवतावादी, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागला. अनिष्ट प्रथा-परंपराविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद मिळाली. मत मांडण्याची व नेतृत्व करण्याची संधी मिळाली. चिकित्सापद्धती शिकले.. भाषण देणे, निर्बंधमुक्त जीवन जगण्याचे बळ, संत-समाजसुधारकांना जाणून घेण्याची क्षमता मिळाली, असे सूर कार्यकर्त्यांमधून उमटले.
त्यानंतर राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी संवाद साधला. विचार-आचार-उच्चार अशा पातळ्यांवर आपण उभे राहिलो. राज्यात, देशात, जगभरात आपल्या कार्याचा ठसा उमटला. भूत-भानामती, जादूटोणा, बुवाबाजी, भ्रामक वास्तुशास्त्र, मिश्र विवाह, पर्यावरण संवर्धन, परिचयोत्तर विवाह, फलज्योतिष, जातपंचायत, कार्यकर्ते-विद्यार्थी-पोलीस-शिक्षकांचे प्रशिक्षण अशा विविध टप्प्यांवर आपण समाजात सुधारणेचे कार्य ३३ वर्षात घडवून आणले.
जादूटोणाविरोधी कायदा व जातपंचायत विरोधी कायदा राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा करून आपण मंजूर करून घेण्यात यशस्वी ठरलो. समाजसुधारणेचे कार्य करीत असताना संस्थापक अध्यक्ष डॉ. दाभोलकर यांना शहिद व्हावे लागले, याविषयी महाराष्ट्राच्या नागरिकांनी याबाबत कायम कृतज्ञता ठेवण्याची अपेक्षा आहे. डॉ. दाभोलकर यांच्या खुन्यांना ९ वर्ष झाली तरी शिक्षा झाली नाही, म्हणून तपास यंत्रणेचा निषेध करीत मारेकऱ्यांना लवकर शिक्षा व्हावी म्हणून केंद्र सरकारकडे याचा पाठपुरावा करणार आहोत, असेही राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी सांगितले. सूत्रसंचालन युवा विभागाची राज्य कार्यवाह प्रियंका खेडेकर हिने केले. तिला घनश्याम येणगे, प्रितेश म्हैसेकर, अतुल बडवे, अमोल चौघुले, विश्वजीत चौधरी यांनी सहकार्य केले. आभार राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी मानले. यशस्वीतेसाठी राज्य सरचिटणीस विनायक सावळे, सुयश तोष्णीवाल, सचिन मेश्राम आदींनी सहकार्य केले.




















