जळगाव : प्रतिनिधी
जळगावातून बोदवड जाण्यासाठी सकाळी व बोदवडहून येण्यासाठी सायंकाळी एक बस नेहमी सोडण्यात यावी अशी मागणी सागर कुटुंबळे यांनी आज निवेदनाद्वारे जळगाव आगार प्रमुखांना केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्याचे ठिकाण असल्याने प्रत्येक तालुका हा जिल्ह्याशी संलग्न असणे आवश्यक असते. बोदवड तालुका स्तरावरून या-ना त्या महत्वाच्या कामानिमित्त तसेच शासकीय कामानिमित्त जळगाव येथे जिल्ह्याचे ठिकाणी जावे व यावे लागते. तसेच बोदवड ह्या तालुक्यामध्ये बोदवड नगरपरिषद पंचायत समिती, दिवाणी न्यायालय बोदवड भुमी अभिलेख विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय स्टेट बँक ऑफ इंडिया, जनता बँक आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, असून तेथे जळगाव येथून बरेच कर्मचारी व प्रवासी यांची ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
बोदवड तालुका हे माजी राष्ट्रपतींचे गाव असून सुध्दा बोदवड येथून जळगाव जिल्ह्याच्या ठिकाणी ये-जा करिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बस सेवा सुरु केलेली नाही.
जळगाव येथून बोदवड करिता सकाळी ८ वाजता एक बस सोडण्यात यावी, तसेच बोदवड येथून संध्याकाळी ६ वाजता जळगाव येथे जाण्याकरिता एक बस सोडण्यात यावी जेणेकरून प्रवाशांना व शासकीय कर्मचाऱ्यांना येणे व जाणे सोपे होईल तसेच रोजच्या प्रवाशांना सुध्दा सोयीचे होईल व महामंडळाचे सुध्दा उत्पन्न वाढेल. तरी वरील अडचणीचा विचार होवून वरीलप्रमाणे बसे सेवा सुरु करण्यात यावी असे निवेदन सागर कुटुंबळे यांनी जळगाव आगारप्रमुख श्री.बंजारा यांना दिले आहे.