
भुसावळ : प्रतिनिधी
देव, संत, गुरू, भाषा, देश यांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यासाठी त्यांना आईची उपमा देऊन त्यांचा गौरव केला जातो. अध्यात्मामध्ये आईचे वर्णन समर्पक करण्यात आले आहे. त्यामुळे अध्यात्मात आईच्या श्रेष्ठतेचे दर्शन घडून येते. आईशिवाय अध्यात्माची पूर्तता होऊ शकत नाही, असे प्रतिपादन मराठी भाषा बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले.
यावल तालुक्यातील न्हावी येथील फिरके परिवारातर्फे शारदा माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित विमलाई व्याख्यानमालेतील दुसरे तथा अंतिम पुष्प गुंफतांना ‘अध्यात्मातील आई’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल लढे होते. प्रारंभी स्वर्गीय सौ. विमल निळकंठ फिरके यांच्या प्रतिमेला सरपंच सौ. भारती चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे दूध उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन नितीन चौधरी, शारदा माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक निळकंठ फिरके, भरत फिरके, मुख्याध्यापक ललित फिरके, मुख्याध्यापक सुनिता फिरके यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकातून बी. ओ. भिरूड यांनी व्याख्यानमाला आयोजनाची पार्श्वभूमी सांगून डॉ. जगदीश पाटील यांचा परिचय करून दिला. ‘अध्यात्मातील आई’ या विषयावर बोलताना डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, घराचे मांगल्य आई तर घराचे अस्तित्व बाप असतो. आई ही अश्रूंचे पाठ असते तर बाप हा संयमाचा घाट असतो. पुराणांमध्ये आईच्या श्रेष्ठत्वाचे वर्णन जागोजागी करण्यात आले आहे. बाप ऋषभदेवासारखा असावा. भाऊ लक्ष्मणासारखा असावा. पुत्र पुंडलिक व भक्त प्रल्हाद यांच्यासारखा असावा तर आई मदालसेसारखी असावी. तिने आपल्या चारही पुत्रांना ब्रह्मज्ञान देऊन मोक्ष मिळवून दिला. आदिशक्ती संत मुक्ताई यांनी संत ज्ञानेश्वरदादांचा राग दूर करून त्यांना ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी प्रेरित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ यांनी घडवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. साने गुरुजी यांनी श्यामची आई या माध्यमातून आईच्या श्रेष्ठतेचे महत्व प्रतिपादन केले. देशाला आपण भारत माता म्हणतो. त्यामुळे मातृभूमीवर आपण आईसारखे प्रेम करतो. आ म्हणजे आस्था आणि ई म्हणजे ईश्वर. आई ही स्वतः अनेक चटके सहन करून आपल्या मुलांना सावली देते. त्यामुळे ती आपली माऊली ठरते, असे डॉ. पाटील म्हणाले. यानंतर त्यांनी आई या विषयावर आधारित कथा, कादंबरी, नाटक, कविता, अभंग, ओव्या, श्लोक, चारोळी यांची माहिती दिली. तसेच आईवर आधारित कविता, अभंग, ओव्या, श्लोक व चारोळी प्रतिनिधीक स्वरूपात सांगितल्या. विमलाई व्याख्यानमाला ही प्रथमच ग्रामीण भागात आयोजित केली असल्याने डॉ. जगदीश पाटील यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. तब्बल तासभर चाललेल्या या व्याख्यानाने संपूर्ण विद्यार्थी व श्रोते तल्लीन झाले होते. आईचा विषय हा भावना व संवेदनांशी निगडित असल्याने श्रोत्यांनी मनापासून दाद दिली. अध्यक्षीय मनोगतात अनिल लढे यांनी स्वर्गीय सौ. विमल फिरके यांच्या आठवणींना उजाळा देऊन व्याख्यानमालेचे कौतुक केले. सूत्रसंचालन नीलिमा भोळे यांनी तर आभार प्रवीण वारके यांनी मानले. यशस्वीतेसाठी शारदा माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
अध्यात्मात आईच सर्वश्रेष्ठ
माझी माय सरसोती असे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी म्हटले आहे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली असे संत ज्ञानेश्वर महाराज यांना म्हटले आहे. विठूरायाला विठू माऊली तू माऊली जगाची तसेच बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई असे म्हटले आहे. मराठी भाषेला माझी भाषा माझी आई शब्द भावनांना देई असे म्हटले आहे. देशाला गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे असे म्हटले आहे तर गुरूला माझा गुरु माझी आई नित्य काळजी आमची घेईन असे म्हटले आहे. त्यामुळे अध्यात्मात आईच श्रेष्ठ असल्याचेही डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.




















