जळगाव मिरर | १२ जुलै २०२६
अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान एका मजुराच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणात रावेर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवत अवघ्या काही दिवसांत हत्येचे गूढ उलगडले असून दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आणि मुख्य आरोपी गणेश संजय घोरपडे (वय 27, रा. भोर, ता. रावेर) हे एकमेकांचे जवळचे मित्र होते. मात्र, गणेश घोरपडे याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याने दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. या संबंधांमुळे दोघांमध्ये अनेकदा शाब्दिक चकमकी झाल्या होत्या.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2026 मध्ये ऐनपूर येथे आरोपी गणेश घोरपडे याला मयताच्या पत्नीसोबत ग्रामस्थांनी रंगेहात पकडले होते. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी त्याला चांगलीच मारहाण केली होती. या घटनेचा राग मनात धरून आरोपीने मयताला, “माझ्या प्रेमात तू आडवा आलास तर तुला ठार मारीन,” अशी उघड धमकी दिली होती. याच वैमनस्यातून त्याने हत्येचा कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
९ जुलैच्या रात्री आरोपी गणेश घोरपडे याने आपल्या साथीदार मेघराज वसंत सांगळे (वय 29) याच्या मदतीने मयताला विश्वासात घेत दारू पाजली. त्यानंतर मोटारसायकलवरून त्याला नांदूरखेडा शिवारात नेण्यात आले. निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर दोघांनी मिळून हाताने गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शेतात टाकून दोघांनी घटनास्थळावरून पलायन केले.
घटना उघडकीस आल्यानंतर रावेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीद्वारे तपासाची दिशा निश्चित केली. संशयितांची हालचाल, मोबाईल तांत्रिक विश्लेषण आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान गुन्ह्याची उकल झाली असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
या हत्येप्रकरणी पोलिसांकडून आरोपींची सखोल चौकशी सुरू असून, गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, तसेच हत्येपूर्वीच्या घटनाक्रमाचा अधिक तपास केला जात आहे. अनैतिक संबंधातून घडलेल्या या खुनामुळे रावेर तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या जलद तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





















