
जळगाव मिरर | २९ मे २०२५
अमळनेर तालुक्यातील धुपी येथील नगाव शिवारातील शेतात विहिरीजवळ तोल गेल्याने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २७ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेत देवयानी संदीप पाटील वय १५ रा. धुपी ता. अमळनेर असे मयत झालेल्या मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील धुपी गावात पंधरा वर्षीय देवयानी पाटील ही मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी २७ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नगाव शिवारातील शेत गट क्रमांक ७/१ मधील भाग्यश्री पिंगळे यांच्या शेतातील विहिरीत देवयानी पाटील ही तोल जावून पडल्याने पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने देवयानीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर अमळनेर ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी देवयानीचे काका रावसाहेब लोटन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेमुळे धुपी गावात शोककळा पसरली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहे.