जळगाव मिरर | ३ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुकीचे सर्वत्र धामधूम सुरु असतांना आता जागावाटपावरून महायुतीमध्ये भाजपकडून शिंदे गटावर दबाव असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशात आता अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील भाजपवर निशाणा साधत सूचक विधान केलं आहे. भाजपने शिंदे साहेबांचा बळी घेऊ नये, असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे.
विविध सर्वेक्षणे, स्थानिक नेत्यांचे फिडबॅक या आधारे शिंदेंनी त्यांचे काही उमेदवार बदलले पाहिजेत, असं भाजपने सुचवल्याचं म्हटलं जातंय. यामध्ये भावना गवळी (यवतमाळ-वाशिम) जागेचाही समावेश आहे. यावरून बोलताना बच्चू कडू म्हणाले की, भाजपने शिंदे साहेबांचा बळी घेऊ नये. त्यांना कशा पद्धतीने मदत केली पाहिजे ते पाहिलं गेलं पाहिजे. भावना गवळी त्या ठिकाणी पाच वर्षांपासून खासदार आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी कोणाला तिकीट द्याव तो त्यांचा प्रश्न आहे.
“मी फक्त अमरावती पुरताच बोलेल. एक खासदार शेतकऱ्यांसाठी, मजुरांच्या प्रश्नासाठी, संत्र्याच्या प्रश्नासाठी ही उमेदवारी आहे. शेतकरी, मजूर, व्यापारी याचं दुकान बंद कळण्याची व्यवस्था येत्या पाच वर्षात सरकारने केली आहे. किराणा, कापड उद्योग बंद झालेले दिसेल. ती अवस्था आमच्यावर येऊ नये म्हणून दिनेश बुब यांना तिथे पाठवायच आहे, असंही बच्चू कडूंनी यावेळी म्हटलं.
भाजपने अमरावतीतून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावती लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिनेश बुब आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाणार असून स्वतः बच्चू कडू उपस्थित राहणार आहेत. आज नामांकन यात्रा काढली जाणार असून आजच्या रॅलीने हे सिद्ध करून दाखवले जाणार आहे की ही निवडणूक नाहीं तर जन आंदोलन आहे. नेते लाचार झालेले आहेत, पण आम्ही एका कार्यकर्त्याला दिनेश बुब यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. प्रहार हे निमित्त आहे, असा विश्वास यावेळी बच्चू कडूंनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केलाय.