
जळगाव मिरर | ६ मार्च २०२६
राज्याचा 2026 चा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीसह अनेक मोठ्या घोषणा केल्या. मात्र या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प “विकासाचे मृगजळ दाखवणारा” असल्याची जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचे सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात तो कोरा झालेला नाही. साधारण पाच वर्षांपूर्वी त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती केली होती. त्यावेळी पात्र-अपात्र अशा अटींचे गुंतागुंतीचे निकष ठेवले नव्हते. फक्त दोन वेळा शेतकरी केंद्रावर गेल्यानंतर त्यांची सरसकट कर्जमुक्ती करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.
ठाकरे पुढे म्हणाले की, त्या काळात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यासही सुरुवात करण्यात आली होती. मात्र त्यानंतर कोरोनाचा काळ आला आणि त्याचदरम्यान त्यांचे सरकार पाडण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर टीका करताना ठाकरे म्हणाले की, एकूण अर्थसंकल्प पाहिला तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही. ‘लाडक्या बहिणींना’ 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र त्याचा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही. कंत्राटदारांसाठी मात्र ठोस योजना असल्याचे दिसते. त्यामुळे शेतकरी आणि कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी म्हटले.
राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेतल्यास हा “कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प” असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली. या अर्थसंकल्पामुळे राज्याचे हित साधले जाईल असे वाटत नाही. शेतकऱ्यांचे खरे भले करायचे असेल तर पात्र-अपात्र अशा अटी न ठेवता कालबद्ध पद्धतीने कर्जमुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच सध्याची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण होणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या अर्थसंकल्पात मोठमोठ्या योजना जाहीर करण्यात आल्या असल्या तरी त्या योजनांसाठी निधी कुठून आणला जाणार, हा मोठा प्रश्न असल्याचे ठाकरे म्हणाले. शेतकरी, मध्यमवर्गीय, नोकरदार आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांच्या हातात प्रत्यक्षात काय पडणार आहे, याचे स्पष्ट उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय 300 कोटी वृक्ष लागवडीची घोषणा करण्यात आली असली तरी त्यासाठी जमीन कुठून आणणार, त्या जागेवर आरक्षण आणले जाणार आहे का, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पावरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत “मुंबईचा माणूस गुजरातला जाऊन करणार काय?” असा टोला लगावला.
दरम्यान, 2047 पर्यंत विकासाच्या मोठ्या घोषणा केल्या जात असल्या तरी तेवढा काळ भारतीय जनता पक्ष टिकणार नाही, असा राजकीय इशाराही ठाकरे यांनी दिला. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





















