जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२३
जळगाव शहरातील ४३ वर्षीय उद्योजकाने कर्जाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आदर्शनगर परिसरातील समृद्धी अपार्टमेंटमधील रहिवासी व उद्योजक अमित जयरामदास माखीजानी (वय ४३,) यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सुरुवातीला त्यांचा मेडिकलचा व्यवसाय होता, मात्र त्यांनी तो बंद करीत एमआयडीसी परिसरात कागदापासून तयार होणाऱ्या उत्पादनाची फॅक्टरी टाकली. त्यासाठी अमित माखीजानी यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. परंतु बँकेकडून कर्जाच्या वसुलीसाठी तगादा होता. तसेच त्यांनी जप्तीची नोटीस देखील पाठविली होती. तेव्हापासून अमित माखीजानी हे तणावात होते. दरम्यान, आज सकाळच्या सुमारास त्यांनी घरातील बेडरुममध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. अमित हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यांच्या कुटुंबियांना धक्काच बसला. त्यांच्या कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला. त्यांनी मृतदेह उतरवून तात्काळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.