
जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२५
राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्वच उत्तम सुरु आहे. असे काही चित्र सध्या दिसत नाही आहे. महायुतीमध्ये असलेल्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद सुरु असला तरी तो चव्हाट्यावर येत नसला तरी आता राज्याच्या दोन मंत्र्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. दापोली येथील सभेत बोलताना नितेश राणे म्हणाले होते, इथून पुढे तुमच्याकडे जर कोणी दगड फेकला तर त्या प्रत्येक दगडाचा हिशोब चुकता होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. आज राज्यामध्ये हिंदुत्वादी विचारांचे सरकार आहे. गृहखाते आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. एफआयआरमध्ये जर नाव आले नसेल, वाचवणारे कोणी असेल ते आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा मोठे नाहीत. संबंधीत खात्यातील काही लोकांनी लक्षात घ्यावे, अशी नाव न घेता मंत्री नितेश राणे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली होती.
नितेश राणे माझे मित्र, पण माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही, असे विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले आहे. तसेच मतदारसंघात शांतता कशी राखावी हे मला चांगले समजते, असा पलटवारही कदम यांनी राणेंना दिला आहे. दापोली येथे सभेत नितेश राणे यांनी योगेश कदम यांच्यावर टीका केली होती. यावर कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
योगेश कदम म्हणाले, मी जन्मापासून शिवसेनेत आहे, बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाचे बाळकडू पाजले आहे. मी कधीही भगवा खाली ठेवला नाही, याचा अर्थ नितेश राणे यांनी समजून घ्यावे, असा टोला देखील योगेश कदम यांनी राणेंना लगावला. आमच्या हातात आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही राहिल. एका शिवसैनिकाला हिंदुत्व शिकवू नये.
पुढे बोलताना योगेश कदम म्हणाले, माझा मतदारसंघ शांत कसा ठेवायचा हे मला चांगल माहित आहे. त्यांनी कुठे सभा घ्यावी? काय घ्यावी? हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. हिंदू धर्माचा प्रचार ते करत असतील तर मला आनंद आहे. पण माझ्यावर जर ते टीका करत असतील तर माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, मी गृहविभागाच्या जबाबदारीचे काटेकोरपणे पालन करतो. आम्ही गोंधळ निर्माण करण्यासाठी नाही, तर लोकांची सेवा आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी काम करतो.