जळगाव मिरर | २७ जुलै २०२५
गावाकडे जात असताना दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या अँगलवर धडकून समाधान बादशाह देशमुख (वय ३८, रा. रोटवद, ता. जामनेर) यांचा मृत्यू झाला. हा अपघात २५ जुलै रोजी रात्री चिंचोलीजवळ घडला. जामनेर तालुक्यातील रोटवद येथे शेती काम करणारे समाधान देशमुख हे २५ जुलै रोजी जळगावला आले होते. रात्री ते घरी जात असताना चिंचोलीजवळ हा अपघात झाला.
या घटनेत अँगल त्यांच्या गळ्यात जाण्यासह डोक्यालाही जबर मार लागला. १०८ रुग्णवाहिकेने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.
२६ जुलै रोजी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. रात्री रुग्णालयात दाखल केले त्यावेळी अनोळखी म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र त्यांच्या मोबाइलवर कुटुंबीयांचे कॉल येणे सुरू होते. त्यावेळी मयताची ओळख पटून ते रोटवद येथील रहिवासी असल्याचे समजले.




















