जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२४
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढू लागला असून राज्यातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. या कडक उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागले आहेत. तर नांदेडमधील तापमान 41 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलं आहे. या कडक उन्हामुळे नांदेडमध्ये पहिला बळी गेला आहे. नांदेडमध्ये उष्माघातामुळे ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील वाढत्या तापमानाने पहिला बळी घेतला आहे. नांदेड जिल्ह्याचे तापमान 41 डिग्री सेल्सिअसच्या वर पोहचले आहे. यामुळे उन्हामुळे नांदेडमधील परमेश्वर सुरजवाड या तरुणाचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या हिमायतनगर शहरात परमेश्वर सुरजवाड हा राहत होता. परमेश्वर कामासाठी दिवसभर घराबाहेर पडला होता. त्यानंतर उन्हातून काम करून सायंकाळी घरी आला. घरी आल्यावर परमेश्वरची तब्येत अचानक खालावली. त्यानंतर रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या तरुणाच्या मृत्यू झाल्याने हिमायतनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, उन्हाचा पारा वाढत ४० पार गेल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. तर तापमानाचा पारा वाढून उष्माघाताच्या रुग्णाची वाढ होत असल्याने सरकारची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. तर वयोवृद्धांना विशेष काळजी घेण्याच आवाहन करण्यात येत आहे. उष्माघात झाल्यास तात्काळ जवळच्या रुग्णलयात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
