स्वच्छता निरीक्षकांना कार्यवाहीच्या सूचना, अन्यथा कारवाई होणार
जळगाव मिरर | १८ फेब्रुवारी २०२६
शहरात स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, जळगाव शहरातील गेंदालाल मिल भागातील अस्वच्छतेची तक्रार नगरसेवकांनी महापौरांकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी दि. १७ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी परिसरातील दुर्गंधी आणि गल्लीबोळातील कचरा पाहून महापौरांनी संताप व्यक्त केला.
स्वच्छता निरीक्षक यांना कारवाईचा इशारा
पाहणीदरम्यान गेंदालाल मिल परिसरातील स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून आले. यामुळे महापौरांनी स्वच्छता निरीक्षक अजय चांगरे यांना चांगलेच धारेवर धरले. “पुढील पाच दिवसांत हा संपूर्ण परिसर चकाचक झाला पाहिजे, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा महापौरांनी यावेळी दिला.
केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनीही स्वच्छतेबाबत जागरूक राहणे गरजेचे असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यांनी परिसरातील रहिवाशांना सूचना केल्या. घंटागाडी आल्यावर आपला कचरा वेळेवर घंटागाडीतच द्यावा. गल्लीबोळात कचरा टाकून अस्वच्छता पसरवू नका. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे, असे त्यांनी सांगितले. या पाहणी दौऱ्यात महापौरांसोबत उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेविका रिटा सपकाळे, विनोद सपकाळे आदी उपस्थित होते.




















