
अमळनेर : प्रतिनिधी
राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेची अमळनेरातील खंडित झालेली परंपरा तब्बल आठ वर्षांनंतर आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रेरणेने अमळनेरात पुन्हा सुरू होत असून यानिमित्ताने खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “आमदार चषक” तथा भव्य राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि.12 डिसेंबर पासून अमळनेरात करण्यात आले आहे.
अमळनेर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रताप महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर या “आमदार चषक”क्रिकेट स्पर्धा होणार असून याची जय्यत आयोजकांकडून सुरू झालेली आहे.या स्पर्धेत प्रथम बक्षीस 1 लाख 11 हजार 111 रुपये तर द्वितीय बक्षीस 55 हजार 555 रु असणार आहे.याव्यतिरिक्त मॅन ऑफ द सिरीज साठी 11 हजार 111 रु आणि उत्कृष्ठ बॉलर,उत्कृष्ठ बॅट्समन,उत्कृष्ठ फिल्डर व उत्कृष्ठ किपर यांना देखील आमदार चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे.या स्पर्धेसाठी प्रवेश फी 8 हजार रुपये असून सदर स्पर्धेत राज्यभरातील जवळपास 32 नामांकित संघ सहभागी होणार आहेत.विशेष म्हणजे या संघाच्या माध्यमातून काही महाराष्ट्र रणजी,गुजराथ रणजी व मध्यप्रदेश रणजी खेळलेले खेळाडू देखील दाखल होणार असल्याने त्यांचा खेळ क्रिकेट शौकिनाना पाहायला मिळणार आहे.प्रत्येकी 20 ओव्हर सामने होणार आहेत.
सदर आमदार चषक चे उद्घाटन खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दि 12 डिसेंबर रोजी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. संघाच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था प्रताप महाविद्यालयाच्या वसतिगृहात करण्यात येणार आहे. खान्देश शिक्षण मंडळाने मैदान व वसतिगृह उपलब्ध करून अनमोल सहकार्य केले आहे,तसेच मैदानाच्या व्यवस्थेसाठी अमळनेर नगरपरिषदेचे सहकार्य लाभत आहे.
या वर्षी अमळनेर क्रिकेट असोसिएशनने इच्छा व्यक्त करताच आमदारांनी मोठ्या उत्साहाने प्रोत्साहन दिले असून त्यामुळे क्रिकेट असोसिएशन चे सदस्य मोठ्या उत्साहात तयारीला लागले आहेत, ही राज्यस्तरीय स्पर्धा 12 डिसेंबर पासून क्रिकेट शौकिनासाठी अमळनेरात पर्वणी ठरणार असून यानिमित्ताने प्रताप चे मैदान गजबजणार आहे. सदर आमदार चषक च्या निमित्ताने स्थानिक विद्यार्थी दशेतील मुलांच्या क्रिकेट खेळास वाव मिळावा त्यांनाही मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा आनंद मिळावा यासाठी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा देखील यादरम्यान घेण्यात येणार असून विजेत्यांना मिनी आमदार चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे,यामुळे विद्यार्थी व पालक वर्गात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.




















