
जळगाव मिरर । १६ नोव्हेबर २०२२
सध्या अल्पवयीन मुलीना टवाळखोर हे नेहमी त्रास देत छळ करीत असतात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे, औरंगाबाद येथे अल्पवयीन मुलगी एकटी शिकवणीहून घरी जाण्यासाठी रिक्षाने येत असताना रिक्षा चालकाने तिला ‘फिरायला आवडेल का? असे म्हणून अश्लील बोलत विनयभंग केला. त्याच वेळी स्वतःला रिक्षाचालकाच्या तावडीतून वाचविण्यासाठी तिने अक्षरक्षः धावत्या रिक्षातून उडी मारली. त्यात तिच्या डोक्याला मार लागला आहे. तर ३९ वर्षीय रिक्षाचालकाला पकडण्यात यश आले आहे. सिल्लेखाना चौकात १३ नोव्हेंबररोजी दुपारी हा प्रकार घडला.
दरम्यान, या प्रकारामुळे रिक्षाचालकांचे गैरवर्तन आणि महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. धावत्या रिक्षातून उडी घेतल्याने तिच्या डोक्याला चांगलाच मार लागला होता, तिला बेशुद्धावस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर रुग्णालयाकडून पोलिसांना एमएलसी प्राप्त झाल्याने हा प्रकार क्रांती चौक पोलिसांपर्यंत गेला.
पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेत तब्बल शंभरावर सीसीटीव्ही फुटेज तपासले. रिक्षाचा क्रमांक अस्पष्ट असल्याने मिळताजुळता क्रमांक असलेल्या तब्बल ११ रिक्षाचालकांची चौकशी केली. त्यातून तिघांना मुलीसमोर हजर करण्यात आले. आरटीओ आणि वाहतूक पोलिस तसेच क्रांती चौक ठाण्याचे उपनिरीक्षक विकास खटके यांची एक टीम यांनी अखेर रिक्षाचालकाचा (एमएच २० ईएफ १५६२) शोध घेत पडेगावात जाऊन त्याच्या घरातून त्याला उचलले. सय्यद अकबर सय्यद हमीद (३९, रा. प्लॉट. १५६, कैसरबाग फकरेआलम मशीदजवळ, कासंबरी दर्गा, पडेगाव) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीला बुधवारी (ता.१६) न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती तपास अधिकारी उपनिरीक्षक अमोल सोनवणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. ही कारवाई निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास खटके, मोहम्मद एजाज शेख, वाहतूक शाखेचे महादेव गायकवाड, संतोष मुदीराज, नरेंद्र गुजर, इरफान खान, संतोष सूर्यवंशी, भावलाल चव्हाण, श्री. सुंदर, हनुमंत चाळणेवाड, शेख मुश्ताक, सज्जन जोनवाल यांच्या पथकाने केली.
रिक्षाचालकाने विनयभंग केल्यानंतर ती मुलगी प्रचंड घाबरली. आपल्यासोबत काही अघटित घडू नये म्हणून सुचेल तसे तिने धावत्या रिक्षातून उडी मारली. पण ती रस्त्यावर पडताच मागून वाहने वेगाने येत होती. तिचे दैव बलवत्तर म्हणून मागून येणाऱ्या वाहनचालकांनी तातडीने ब्रेक दाबले. त्यामुळे वाहने थांबली. तसे झाले नसते तर… हा विचारही मन सुन्न करणारा आहे. त्यामुळे रिक्षासह अन्य वाहनांनी ये-जा करणाऱ्या मुलींनी कायम सतर्क राहायला हवे. आपण नियमित ज्या वाहनात प्रवास करतो, त्याचा क्रमांक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा. अनोळखी व्यक्तींशी फारसे बोलू नये. कुठलीही माहिती देऊ नये.





















