जळगाव मिरर / २२ मार्च २०२३ ।
देशात आपल्या अदभूत चमत्काराने भाविकांचे लक्ष वेधून घेणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा दुसऱ्यांदा राज्यात दौरा केला. यावेळी त्यांनी मुंबईचं नाव बदलण्याचं विधान केलंय.
मुंबई शहराचं यापूर्वीच नाव हे बॉम्बे होतं. मात्र, बॉम्बे नाव बदलून ते मुंबई करण्यात आलंय. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर जगाची नजर असते. त्यामुळे, मुंबई जगप्रसिद्ध शहर असून कोट्यवधी लोकांची भूक भागवण्याचं काम मुंबई करते. मात्र, या मुंबईला माया नगरी असंही संबोधलं जातं. बॉलिवूड विश्व, आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारीही मुंबईची ओळख आहे. त्यामुळे, मुंबईला माया नगरी म्हटलं जातं. मात्र, मुंबईचं हेच माया नगरी नाव बदलायचंय, मुंबईला माया नगरी म्हणू नका, असे आवाहन धीरेंद्र शास्त्री यांनी केलंय.
धीरेंद्र शास्त्री हे २ दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले होते, त्यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम येथे मोठ्या गर्दीत पार पडला. मात्र, त्यांच्या मुंबई दौऱ्यालाही अनेकांचा विरोध होता. तर, अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही त्यांना आव्हान दिलं होतं. त्यावरही, धीरेंद्र शास्त्री यांनी भाष्य केलंय.
मुंबईतील येड्यांनो तुम्ही म्हणता ही माया नगरी आहे, पण आता मी म्हणतो माया नगरीला माधव नगरी बनवायचं आहे. तुम्ही माया खूप जमा केली, आता बागेश्वर धामसोबत माधवलाही सोबत घेऊया, असे आवाहनही बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी केलंय. तसेच, मी आव्हांना घाबरत नाही, मी जर महाराष्ट्रात आलो नसतो तर विरोधकांना जिंकल्याचा आनंद झाला असता, असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपण कुणालाही घाबरत नसल्याचे म्हटले.
