जळगाव मिरर | ८ डिसेंबर २०२५
राज्यातील नाशिकमध्ये २०२७ला कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी तपोवनमध्ये ‘साधुग्राम’ उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी तब्बल १८०० झाडे तोडण्यात येणार आहेत. या वृक्षतोडीला प्रचंड विरोध होत असून नाशिककर आणि पर्यावरणप्रेमींनी याविरोधात जोरदार आवाज उठवला आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासह राज ठाकरे यांनीही वृक्षतोडीला विरोध करत सरकारवर गंभीर आरोप केला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांच्या नेतृत्त्वामध्ये मनसेने तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आंदोलन केले होते. अनेक कलाकार या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यानंतर आता सयाजी शिंदे यांची मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेतली आहे.
तपोवनाच्या आंदोलनाला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला त्याच संदर्भात माझी त्यांची चर्चा झाली. झाडं कशी वाचली पाहिजेत याबाबत चर्चा केली. वेगळी झाडं वगैरे लावता येत नाही. १५ फुटांची झाडं वगैरे काही अर्थ नाही. कुंभमेळा झाला पाहिजे त्याबाबत आदर आहेच. पण नवीन झाडांची फसवणूक नको, आहे ती झाडं तोडली जाऊ नये. वनराई आहे, देवराई आहे ती तुटायला नको ही आमची भूमिका आहे. उद्धव ठाकरेंचीही भेट मी घेणार आहे. ज्यांनी पाठिंबा दिला आहे त्यांची आम्ही भेट घेणार आहोत. वेळ पडली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेणार असल्याचे सयाजी शिंदे म्हणाले.
एकीकडे, तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात आज नाशिक महापालिकेत पर्यावरणप्रेमींचे प्रतिनिधी आणि मनपा अधिकारी यांच्यात बैठक पार पडणार आहे. तर दुसरीकडे, वृक्षतोडीच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आणि सयाजी शिंदे एकत्र येऊन तपोवनातील लढा आणखी तीव्र करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





















