जळगाव मिरर | ३० मार्च २०२४
पारंपारिक वेशभूषा केलेले असंख्य विद्यार्थी,महाराष्ट्र धर्माचे प्रतीक असलेले असंख्य भगवे झेंडे, शिवरायांच्या पराक्रमाची गीते, जय शिवराय या गगनभेदी घोषणां आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी अशा आगळ्यावेगळ्या पारंपरिक पध्दतीने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात गुरुवार ता. २८ रोजी तिथीनुसार शिवजयंती सोहोळा उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराजांच्या मिरवणूकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शक शिवव्याख्याते हर्षल पाटील यासह प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी या सोहळ्याचे प्रास्ताविक करतांना म्हटले कि, छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी योद्धे होते, या पराक्रमाबरोबरच व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांकडे उत्कृष्ट नेतृत्व गुण, प्रशासन क्षमता, निर्दोष नियोजन कौशल्य आणि विलक्षण दृष्टी होती ते काळाच्या पुढे होते. त्यानी सदैव काळाच्या पलीकडे पाहिले, त्यांनी त्याच्या काळात उद्योग, जलसंधारण, जलसंवर्धन, पर्यावरण, शब्दकोष आणि शिवकालीन तलाव यांची विशेष व्यवस्था केली होती. पाणी अडवा पाणी जिरवा हा उपक्रम शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा आपल्या काळात राबविला. त्याचबरोबर दुष्काळ निवारण्याची यंत्रणाही त्यांच्या काळात महाराजांनी राबविली तसेच राष्ट्रप्रेमाची भावना, स्त्रियांबद्दल आदरभाव आणि पराक्रम या त्रिसूत्रीची देणगी छत्रपतींनी आपल्या स्वकर्तृत्त्वातून स्वराज्याच्या रयतेला दिली असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यानंतर कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शक व शिवव्याख्याते हर्षल पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. थोडक्यात फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा त्यांनी यशस्वीपणे सामना केला. राज्यकारभारात मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. आदर्श राजा कसा असावा, याचे छत्रपती शिवाजी महाराज एक मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन शतकांनंतर, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबरच अनेक भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांना आद्यराष्ट्रवादी आणि हिंदूंचे नायक मानले यातच त्यांचे महत्त्व अधोरेखित होते तसेच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव पुकारले, तरी आपल्यामध्ये एक असामान्य ऊर्जा निर्माण होते, रक्त सळसळते. शिवाजी महाराज हे फक्त युद्ध व लढायापुरतेच मर्यादित नसून एक कुशल प्रशासक, व्यवहारकुशल अर्थनीतीतज्ज्ञ, स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्ते, कुशल संघटक अशा अनेक गुणांनी संपन्न असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. इतिहासात मात्र अफजलखानाचा वध, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका व शाहिस्तेखानाची बोटे छाटली याच मोहिमांचा उल्लेख अधिक प्रमाणात आढळून येतो. आपण जर शिवचरित्र व्यवस्थितपणे अभ्यासले, तर आपल्याला असे लक्षात येईल, की आजच्या आधुनिक युगातील समस्या सोडविण्यासाठी सुद्धा शिवरायांचे व्यवस्थापन लागू पडते असे स्फूर्तिदायी भाषण त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील विध्यार्थी व विद्यार्थींनींनी ‘छत्रपती शिवाजी’ या कार्यक्रमावर सांस्कृतिक प्रात्यक्षिक सादर केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवार, प्रा. अमोल जोशी व प्रा वसीम पटेल यांच्या नेतृत्वाखाली गौतम पांडे, वेदांत शेजवळ, श्रेयाल बडगुजर, भाविका घाटे, अक्षया दाणी, कन्हैया चौधरी, शुभम पाटील, गौरव पाटील, देवश्री भक्कड, करण जाधवानी, इम्रान शेख, रिया तळेले, मंजिरी भोळे, स्वरांगी श्रावगी, प्रथमेश मिस्तरी, भाग्येश चौधरी, हार्दिक पाटील, विनोद यादव, यशराज पाटील, स्वप्नील श्रावणे, गणेश पाटील, जयेश पाटील, तुषार पाटील, मोहित सोनवणे, रोहित मराठे, प्रतिक दांडगे व जयेश घेवारे या स्टुडंट कौन्सिलच्या विद्यार्थ्यांनी केले. सूत्रसंचालन विवेक पाटील या विध्यार्थ्याने केले तर स्वागत आणि आभार प्रज्वल वाकुलकर यांनी मानले. सदर शिव महोत्सवाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.