
जळगाव मिरर | २४ मार्च २०२६
वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात संपन्न झालेल्या ‘बाल मराठी संमेलना’च्या मुख्य रंगमंचावर जळगाव येथील श्रेयस प्रकाशनातर्फे महत्वपूर्ण बालसाहित्याचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यात पुणे आणि अहिल्यानगर येथील साहित्यिकांच्या बालनाटकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले.
हा प्रकाशन सोहळा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के सामंत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी श्रेयस प्रकाशनाचे प्रकाशक योगेश शुक्ल उपस्थित होते. याप्रसंगी बालरंगभूमी परिषदेची मध्यवर्ती कार्यकारिणी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रामुख्याने ज्ञानेश्वर गायकवाड (पुणे): यांच्या ‘गाऱ्हाणं’ आणि फुलपाखराची गोष्ट या बालनाट्य पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यांच्या अनुपस्थितीत पुण्याच्या प्रसिद्ध अभिनेत्री अंजली धारू यांनी त्यांचे प्रतिनिधीत्व केले. तसेच अनंत जोशी (अहिल्यानगर) यांच्या ‘फुलपाखरू व २ बालनाट्य’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
“बालसाहित्याला आणि बालरंगभूमीला समृद्ध करण्यासाठी नवीन संहितांची गरज आहे. श्रेयस प्रकाशनासारख्या संस्था जळगावमधून येऊन राज्यातील विविध शहरांमधील लेखकांचे साहित्य प्रकाशित करत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे,” असे प्रतिपादन ॲड. निलम शिर्के सामंत यांनी केले.





















